– माधव विद्वांस
सातव्या शतकात सुमारे 15 हजार किलोमीटर चीनपासून भारत, श्रीलंका व परत चीन असा प्रवास करणारे तसेच 14 वर्षे भारतात राहून आसेतु हिमाचल पायी प्रवास करणारे ह्यू-एन-त्संग यांचा आज जन्मदिन.
ह्यू-एन-त्संग (युआनच्वांग) यांचा जन्म 6 एप्रिल 602 रोजी चीनमधील हेनन प्रांतातील चेनलिऊ येथे झाला. त्यांचे वडील चिनी तत्वज्ञ कॅन्फुशियस तसेच बौध धर्माचे अभ्यासक होते. ह्यू-एन-त्संग यांचा मोठा भाऊ आधीपासून बौद्ध विहारात भिक्खू होता. त्यांनी आपल्या भावाप्रमाणे बौद्ध भिक्खू बनण्याची इच्छा व्यक्त केली. वर्ष 611 मध्ये त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांनी मोठा भाऊ चेन सु सोबत लुओयांग येथील जिंगटू विहारात पाच वर्षे वास्तव्य केले. या काळात त्यांनी महायान तसेच विविध प्रारंभिक बौद्ध शाखांचा अभ्यास केला. सिचुआनमधील चेंगडू येथे त्यांना वयाच्या 20व्या वर्षी भिक्खू म्हणून नियुक्त केले गेले.
त्या काळात चीनमध्ये बौद्ध धर्माचे अनेक पंथ होते आणि त्यांच्याविषयी पुष्कळ अनिश्चितता होती. तेव्हा त्यांनी भारतात जाऊन तेथील विद्वानांकडून आपल्या संशयाचे निराकरण करून घेण्याचा निश्चय केला. भारतात असताना बौद्ध ग्रंथ मिळवणे आणि बौद्ध धर्माचे शिक्षण घेणे हा त्यांचा मुख्य उद्देश होता; परंतु त्यांनी त्या बरोबर भेट दिलेल्या जमिनींच्या राजकीय आणि सामाजिक बाबींच्या नोंदी त्यांनी करून ठेवल्या आहेत. ते जेथे जेथे गेले, त्याचे त्यांनी समग्र वर्णन केले आहे. त्या प्रदेशाचा विस्तार, त्याची राजधानी, तेथील जमिनीचा कस, उत्पन्न होणारी अन्नधान्ये, हवामान, लोक, त्यांचे आचारविचार, तेथील राजा व त्याची शासनपद्धती, धर्म, पंथ, मठ, धर्मग्रंथ, तेथे जतन केलेले बुद्धांचे अवशेष, त्याविषयींच्या सांप्रदायिक कथा आणि इतर विस्तृत माहिती प्रवासवृत्तांतातून मिळते.
प्रवासास सुरुवात करण्याआधी ह्यू-एन-त्संग यांनी आपल्या देशाच्या सम्राटाला परदेशगमनाची परवानगी मागितली पण त्याला नकार मिळाला. मात्र, निराश न होता त्यांनी गुप्तपणे प्रवास करण्याचा निश्चय केला. पूर्वेकडे तत्कालीन प्रचलित वापरत असलेल्या व्यापारी मार्गाने (सिल्क रूट) ते काराकोरामच्या दिशेने जाऊ लागले; परंतु गोबीच्या वाळवंटात ते रस्ता चुकले. त्या वेळी ते 26 वर्षांचे होते. दिवसा कोठेतरी लपून राहावे आणि रात्री प्रवास करावा, अशा रीतीने त्यांनी गोबीच्या वाळवंटातून एकट्याने मार्गक्रमण केले.
चीनमधील सिंक्यांग-ऊईगुर प्रांतातील तुर्फान येथे आल्यावर तेथील अधिपती त्यांना आपल्या दरबारी धर्माध्यक्ष म्हणून राहण्याविषयी आग्रह करू लागला आणि त्यांना पुढे जाऊ देईना.त्यामुळे ह्यू-एन-त्संग यांनी अन्न सत्याग्रह सुरू केला. तेव्हा तुर्फानच्या अधिपतीने त्यांच्या पुढील प्रवासाची सर्व व्यवस्था करून त्यांना निरोप दिला. नंतर ह्यू-एन-त्संग कूचा, समरकंद, बाल्ख या मार्गाने हिंदुकुश पर्वत ओलांडून गांधारमधील बामियान येथे आले. सध्या हा भाग अफगाणिस्तान म्हणून ओळखला जातो. येथील ग्रीस कलेचा प्रभाव असलेली गौतम बुद्धांची अलंकारजडित भव्य मूर्ती त्यांनी पाहिली.तेथील आसपासच्या गुंफांचेही वर्णन त्यांनी केले आहे. (तालिबानीमध्ये या मूर्ती लादेनच्या अनुयायांनी नष्ट केल्या)
तेथून ते खैबरखिंडीने पेशावर येथे येऊन पोहोचले. पेशावर (प्राचीन पुरुषपूर) ही कनिष्काची राजधानी आणि वसुबंधु व असंग या विख्यात बौद्ध तत्त्वज्ञांची कर्मभूमी होती. पण ती हुणांच्या आक्रमणामुळे उद्ध्वस्त झाली होती. त्यांनी पेशावर येथे असलेल्या भव्य स्तुपाचे व बुद्धांच्या अस्थी असल्याचे वर्णन केले आहे. त्यानंतर ते कापिसा येथे आले. तेथे त्यावेळी धर्मपरिषद झाल्याचा उल्लेख आहे. त्यानंतर ह्यू-एन-त्संग नगरहर (सध्याचे जलालाबाद) येथे आले. तेथून तक्षशीला येथे आले. येथे मौर्य काळापासून असलेले विद्यापीठ होते. तेथून ते पुंच्छ, राजौरी मार्गे काश्मिरात पोहोचले.
विद्वत्वं च नृपत्वं च न एव तुल्ये कदाच न् । स्वदेशे पूज्यते राजा विद्वान् सर्वत्र पूज्यते ॥ या उक्तीप्रमाणे तेथेही त्यांचे भव्य स्वागत झाले. काश्मीरमध्ये त्यांनी दोन वर्षे राहून महायान पंथाच्या एका वृद्ध विद्वानाजवळ विज्ञानवादाचा अभ्यास केला. त्यानंतर ते शाकल (सध्याचे सियालकोटमार्गे, मथुरा, सांकाश्य, कनौज, अयोध्या, प्रयाग, कौशांबी, श्रावस्ती इ.मार्गाने बुद्धांचे बालपणीचेस्थान कपिलवस्तू येथे जाऊन पोहोचले. येथील पवित्र स्थळाचे दर्शन घेतल्यावर सारनाथ व गया या सुप्रसिद्ध बौद्ध धर्मस्थळांना भेट देऊन ते मगध (सध्याचे बिहार) येथील नालंदा येथे आले. तेथे त्यांनी शीलभद्र या विख्यात पंडिताजवळ योगाचार, तत्त्वज्ञानाचे अध्ययन केले. ह्यू-एन-त्संग नालंदाला पंधरा महिने राहिले होते. त्यानंतर ते ईशान्य भागातही गेल्याच्या नोंदी आहेत. त्यानंतर ते कलिंग (सध्या ओडिशा) येथील रत्नगिरी उदयगिरी धौली (सम्राट अशोकाच्या वेळी कलिंग युद्धाची जागा) येथे गेले.
त्यानंतर ते आंध्र प्रदेशातील नागार्जुन कोंडा येथे आले. तेथील वर्णनही त्यांनी करून ठेवले आहे. त्यानंतर ते तामिळनाडूमधील कांचीपुरम येथे गेले. ह्यू-एन-त्संग ह्यांच्या नोंदीप्रमाणे नालंदा विद्यापीठाचे प्रमुख धर्मपाल यांचा जन्म कांचीपुरम येथे झाला. तेथून मलयगिरी येथील जंगलात चंदनाची झाडे विपुल आहेत असे लिहिले. एका संस्कृत सुभाषित वचनात मलये भिल्ल पुरन्ध्री चन्दन तरु काष्ठं इन्धनं कुरुते॥ असा उल्लेख आढळतो. यावरून ह्यू-एन-त्संग यांच्या सूक्ष्म निरीक्षणाची प्रचिती येते. त्यानंतर ते श्रीलंकेत गेले. तेथील धार्मिक स्थळांचे वर्णनही केले आहे.
भारतातील परतीच्या प्रवासात त्यांनी चालुक्य राजांची गाठ घेतल्याचा उल्लेख आहे. ते समुद्रकिनारपट्टीवरून कार्ला येथे गेले असावेत. कार्ले लेणी हा 16 बौद्ध लेण्यांचा गट असून त्यातील एक चैत्यगृह व इतर विहार आहेत. ही लेणी प्राचीन काळी ‘वलुरक’ नावाने ओळखली जात असे व त्यानंतर वेरूळ व अजिंठा येथे गेले. चालुक्य सम्राट द्वितीय पुलकेशी याची भेट त्यांनी इ. स. 641 मध्ये नाशिक येथे घेतली असावी. ह्यू-एन-त्संग यांनी पुलकेशीचे, त्याने हर्षवर्धनावर मिळविलेल्या विजयाचे तसेच महाराष्ट्राचे आणि तेथील शूर, स्वाभिमानी व विद्याप्रेमी लोकांचे सुंदर वर्णन आपल्या प्रवासवृत्तांतात लिहून ठेवले आहे. तेथून ते गुजरातमधील वाल्लभिपूर व जुनागढ येथे गेले. येथील लोक व्यापारीवृत्तीचे असल्याचा त्यांनी उल्लेख केला आहे. त्यानंतर ते सांची येथे गेले. भारतातून परत जाताना ते सिंधू नदीच्या पुरात अडकले त्यावेळी त्यांच्या काही चोपड्या हरवल्या.
सन 645 मध्ये चीनला परतल्यावर, ह्यू-एन-त्संग यांचे खूप सन्मानाने स्वागत करण्यात आले. त्यांनी तांगचा सम्राट ताईझोंग यांनी देऊ केलेल्या सर्व उच्च नागरी नियुक्त्या नाकारल्या. त्याऐवजी ते एका विहारात राहून सेवानिवृत्त झाले आणि सन 664 मध्ये त्यांचा मृत्यू होईपर्यंत त्यांनी आपली ऊर्जा बौद्ध ग्रंथांचे भाषांतर करण्यासाठी समर्पित केली. बौद्ध ग्रंथांचे भाषांतर करण्यात ह्यू-एन-त्संग यांच्या विलक्षण कामगिरीचा उत्सव साजरा करण्यासाठी, तांगचा सम्राट गाओझोंग याने शिलालेखक वॅन वेनशाओ यांना दोन शिलालेख बसवण्याचे आदेश दिले होते. 5 फेब्रुवारी सन 664 मधे त्यांचे निधन झाले.