अरुणा सरनाईक
गुढीपाडवा… भारतीयांचा नवीन वर्षदिन. या दिवसापासून आपल्या नववर्षाची सुरुवात होते. साडेतीन मुहुर्तांपैकी एक महत्त्वाचा मुहूर्त. कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात या दिवसापासून केली जाते.
या सणाची पार्श्वभूमी वेगवेगळ्या पौराणिक, धार्मिक कथांनी सजलेली आहे. या दिवसापासून कोणत्याही चांगल्या कार्याची सुरुवात केली तर, ते काम पूर्णत्वाला जाते, ते काम योग्य फलदायी ठरते अशी धारणा आहे. यासंदर्भातील पौराणिक कथा अशी की, या दिवशी प्रभू रामचंद्रांनी दशानन रावणाचा वध करून अयोध्येला आगमन केले होते. त्यांच्या स्वागताप्रीत्यर्थ अयोध्येच्या नगरजनांनी आपल्या सदनाला गुढ्या उभारून दिव्यांची रोषणाई केली होती. तो दिवस चैत्रपाडवा म्हणजे वर्षाचा प्रथम दिवस होता. तेव्हापासून गुढी उभारण्याची प्रथा रूढ झाली. तीच प्रथा पडली. कोणाच्याही स्वागताला गुढ्या, तोरणे यांनी घर सजवून तयार करण्याची प्रथा आजही पाळली जाते. गुढीपाडव्यासंदर्भातील दुसरी कथा अशी की, शालिवाहन नावाच्या राजाने मातीची सेना उभारून त्यात प्राण फुंकून त्यांना सजीव केले आणि त्या सेनेने राज्याचे शत्रूपासून संरक्षण केले. तो हाच दिवस होता. अशा अनेक रूपककथा आणि दंतकथा या चैत्रपाडव्याशी निगडित आहेत.
वास्तविक आपण सर्वजण आपल्या या पौराणिक, ऐतिहासिक कथा, लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत. आपल्या आई-वडिलांनी आजी-आजोबांनी आपले कुतूहल सांभाळलेले आहे. सण कोणताही असो त्यामागील कथा आपल्याला सांगितल्या जात असत. एवढंच नव्हे तर ठराविक सणांसाठी ठराविकच पदार्थ त्या-त्या दिवशी बनविले जात असतं. गुढीपाडव्याचा सण हा ज्या चैत्रात येतो त्याकाळात निसर्गसुद्धा नावीन्याने नटलेला असतो. शिशिराच्या पानगळीचे दिवस जवळपास संपत आलेले असतात. अशा दिवसांत सरत्या वर्षाला निरोप द्यायचा आणि उगवत्या वर्षाचे स्वागत करायचे. निरोप आणि स्वागत, अंत आणि सुरुवात अशा मिश्र भावनांचे मनातील आंदोलन मानवी भावनांचे समतोलन करायला निसर्ग शिकवतो. म्हणूनच या दिवसांचे प्रयोजन केले गेलेले आहे.
हे दिवस सरत्या माघाचे, येणाऱ्या फाल्गुनाचे. माघाची थंडी ओसरायला लागलेली असते. चिमण्यांचे धुळीस्नान सुरू होते. आपल्यापेक्षा निसर्गाला बदलत्या ऋतूंची चाहूल सर्वप्रथम लागते. महाशिवरात्र झाली, महादेवाची यात्रा करून सरत्या दिवसांना निरोप दिला जातो. चिमण्यांचे धुळीस्नान जाणाऱ्या दिवसांवर धूळ टाकून त्याच्या खुणा पुुसट करायला मदत करते. झाडाच्या मुळाशी पिकल्या पानांचा, आठवणींचा खच पडलेला असतो. झाडांच्या टोकाला नवीनतेचा स्पर्श करीत येणाऱ्या नवी दिवसांची, कोवळी पाने नांदी देत असतात. चिंचेचा चिगोर, कडुलिंब, आंब्याचा मोहोर, एक गंध वातावरणाला भारीत करीत असतो. दिवस वाढीवरच्या मुलांसारखे लांबत जातात आणि रात्र संकोचित जाते. आकाश निळेभोर, क्वचित पांढरे शुभ्र होत जाते. दिवसभराचा उष्मा, संध्याकाळचा आल्हाददायक गारवा आणि पहाटेचा थंडीचा हलका वारा. सारे वातावरण पोषक असते. या सर्व वातावरणाचा आपल्या मनावर एक सुखकर परिणाम होत असतो. अशा सुंदर आणि उल्हासित वातावरणात मराठी नववर्षाचा दिवस चैत्रपाडवा म्हणजेच गुढीपाडवा येतो.
चैत्राचे दिवस असे मंगलमय वातावरणाने भारलेले असतात. सर्वत्र आनंदोत्सव आणि प्रसन्नतेचे वातावरण असते. गुढीपाडवा आणि गुढीची पूजा कशी करायची याविषयी पूर्वापार चालत आलेल्या परंपरा रूढी आहेत. आज त्या आपल्याला इंटरनेटवर देखील पाहायला मिळतात. गुढीचा दंड हा वेळूचा म्हणजेच बांबूचा असतो. त्याला तेल, हळद लावून उष्ण पाण्याने स्नान घालतात आणि त्यावर चांदीचा, तांब्याचा लोटा वरच्या बाजूला ठेवतात. तत्पूर्वी वेळूला आंब्याची, कडुनिंबाची डहाळी बांधतात. रेशमी कपडा किंवा साडी नेसवतात. साखरेच्या गाठी आणि चाफ्याच्या फुलांची माळ बांधतात. सकाळी घरातील मंडळी स्नान करून नवीन कपडे परिधान करून अशी तयार केलेली गुढी अंगणात उंच जागी बांधतात. सूर्यास्तानंतर अक्षदा टाकून गुढी खाली उतरवतात. या पारंपरिक पद्धतीने वर्षानुवर्षे गुढीचा हा सण साजरा होत असतो.
या दिवसापासून उन्हाळा सुरू होतो. सर्वत्र उष्ण वारे वाहतात. विशेषतः विदर्भात तर उन्हाळा विशेषत्वाने जाणवतो. या सर्व वातावरणाला तयार होण्यासाठी कडुनिंबांची पाने आणि धने यांची चटणी गुढीच्या नैवेद्याला ठेवतात. त्यामागील शास्त्रीय उद्देश असा की, या चटणीच्या सेवनाने शरीरात थंडावा निर्माण होतो. तो पुढील येणाऱ्या उष्णतेला सामोरे जाण्यासाठी मदतगार ठरतो. चैत्र महिना! मराठी नववर्षाचा पहिला महिना, वातावरणातील उत्साहात भर टाकणारा! गेल्या दोन वर्षांपासून भारतातील नाहीतर जगातील वातावरण बदललेले आहे. करोना नावाच्या महाभयंकर राक्षसाने सर्वत्र हाहा:कार माजवला होता. तो संपला असे वाटत असताना पुन्हा सक्रिय होतो. एक विचित्र दडपण, दहशत या महामारीने गेल्या दोन वर्षांपासून आपण अनुभवत आहोत.
कोणताही कार्यक्रम निखळ मनाने, आनंदाने आपण साजरा केलेला नाही. तिसरी लाट येणार येणार म्हणत असताना ती येऊनही गेली. भीती काही प्रमाणात कमी होऊ लागली. आता शाळा, महाविद्यालये, चित्रपटगृह गजबजू लागलेले आहेत. मनमोकळे वातावरण आणि आनंद असे पोषक वातावरण यावर्षीच्या गुढीच्या पूर्वसंध्येला जाणवू लागलेले आहे. म्हणूनच यावर्षीची गुढी आपल्याला आनंद देणारी, सौख्य देणारी लाभो. जागतिक पातळीवर देखील शांतीचे वातावरण राहावे, याच प्रार्थनेने हा सण साजरा करूया. विकसित, आनंदी, निरोगी मन आणि आनंदी निरोगी वातावरण मिळावे हाच संदेश या गुढीपाडव्याला घरोघरी गुढी उभारून देऊ या.