– प्रकाश गद्रे
परमेश्वराने प्रारंभी आकाश व पृथ्वी निर्माण केली. परमेश्वराने मानवाला आपल्या हाताने स्वस्वरूप निर्माण केले व मानवास सुंदर अशा एदेन बागेत, मशागत करण्यासाठी ठेवून दिले. देवाने मनुष्यास असे सांगितले होते, की या बागेतील सर्व झाडांचे फळ यथेच्छ खावे; परंतु एका झाडाचे फळ खावू नको, त्यास स्पर्शही करू नको. त्या झाडाचे नाव होते बर्या-वाईटाचे ज्ञान करून देणारे झाड. या विशिष्ट झाडाचे फळ खाण्यास देवाने मनुष्यास मनाई केली होती व असे म्हटले होते की, ज्या दिवशी तू हे फळ खाशील, त्याच दिवशी तू मरशील. देवाने मानवास त्या बागेत ठेवले होते, त्यामागे देवाचा उद्देश खूपच चांगला होता. देवाने त्या मनुष्यास आशीर्वाद दिला होता, फलद्रूप व्हा, बहूगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेत आणा. समुद्रातील मत्स्य, आकाशातील पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणिमात्र यावर सत्ता करा.
परंतु परमेश्वराने, उत्पन्न केलेल्या सर्व वनचरात सर्प फार धूर्त होता. तो त्या पुरुषाच्या पत्नीस म्हणाला, ‘‘तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये, असे देवाने तुम्हास सांगितले हे खरे काय?’’ स्त्रीने सर्पास म्हटले, ‘‘बागेतल्या झाडांची फळे खाण्यास आम्हाला मोकळीक आहे, पण बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाच्या फळाविषयी देवाने सांगितले आहे की ते खाऊ नका. त्याला स्पर्शही करू नका. कराल तर मराल.’’ सर्प स्त्रीला म्हणाला, ‘‘तुम्ही खरोखर मरणार नाही.’’ त्या झाडाचे फळ खाण्यास चांगले, दिसण्यात मनोहर व शहाणपणाच्या प्राप्तीस इष्ट आहे, असे त्या स्त्रीला दिसून आले.
तेव्हा तिने त्याचे फळ काढून खाल्ले व आपल्याबरोबर आपल्या पतीसही ते दिले व त्याने ते खाल्ले. तेव्हा त्या उभयतांचे डोळे उघडले आणि आपण नग्न आहोत असे त्यांस कळून आले. तेव्हा त्यांनी अंजिराची पाने शिवून आपणासाठी कटिवेष्टने केली. यानंतर शिळोप्याचा वारा सुटला असता, परमेश्वर बागेत फिरत होता, त्याचा शब्द त्यांस ऐकू आला, तेव्हा परमेश्वर देवाच्या दृष्टीस पडू नये म्हणून आदाम व त्याची स्त्री, ही बागेतील झाडाच्या आड लपली. परमेश्वर देवाने आदामास हाक मारून म्हटले, ‘‘तू कोठे आहेस.’’ तो म्हणाला, ‘‘मी बागेत. तुझा शब्द ऐकला तेव्हा मी नग्न आहे म्हणून भ्यालो व लपलो.’’ देवाने म्हटले, ‘‘तू नग्न आहेस, हे तुला कोणी सांगितले. त्या झाडाचे फळ तू खाऊ नकोस, अशी मी तुला आज्ञा केली होती, त्याचे फळ तू खाल्ले काय?’’ ‘‘होय.’’
प्रिय वाचका, त्या दिवसापासून आजपर्यंत मनुष्य देवाची आज्ञा मोडीत आला आहे व देवाच्या इच्छेविरूद्ध जीवन जगू लागला आहे. पवित्र शास्त्रात सांगितले आहे, तू आपल्या परमेश्वराचे भय धर व केवळ त्याचीच आराधना कर, तसेच आई-वडिलांचा सन्मान कर. हत्या करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, अभिलाषा धरू नको इत्यादी अशा अनेक आज्ञा देवाने मनुष्याला दिलेल्या आहे. परंतु आज आपण पाहतो की मनुष्य (पुरुष व स्त्री) देवाच्या आज्ञेचा भंग करीत आहेत. मानव देवासमोर नग्न झाला आहे. म्हणजेच गुन्हेगार, दोषी, अपराधी ठरलेला आहे. आणि देवाविरूद्ध जगणे म्हणजे सर्वस्वी नाश किंवा अटळ मृत्यू. कारण देवाने सांगितलेच होते फळ खाशील तर खास मरशील.
हे मरण म्हणजे पापाचे वेतन होय. पवित्रशास्त्र सांगते, सर्वांनी पाप केले आहे व ते देवाच्या गौरवास उणे पडले आहेत. नीतिमान कोणीही नाही, एकदेखील नाही, पवित्र शास्त्रात सांगितले आहे, देवाने जगावर (तुम्हा आम्हावर) एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र (प्रभू येशू ख्रिस्त) दिला. अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवील त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.
2024 वर्षांपूर्वी हाच देवाचा पुत्र प्रभू येशू, सर्व मानवाला पापाच्या शिक्षेतून सोडविण्यासाठी व मानवाला क्षमा देण्यासाठी स्वतः पापाचे प्रायश्चित देण्यासाठी, त्या कू्रसखांबावर त्याने प्राण दिला. त्या लोकांनी, येशूचे हाल हाल केले. येशू स्वतःचा वधस्तंभ घेऊन चालत चालत त्या गुलगथा टेकडीवर गेले. तिथे त्यांना वधस्तंभावर खिळे ठोकण्यात आले. तो दिवस होता गुड फ्रायडेचा. येशू आपल्याऐवजी मरण पावला. आपण मरावयास हवे होते; परंतु येशू आपल्या करीता मरण पावला. म्हणून आपण प्रभू येशूंवर पूर्ण अतःकरणाने विश्वास ठेवला पाहिजे.