– अरुण गोखले
एकदा एका गुरूंकडे त्यांचे दोन शिष्य आले. त्या दोघांनीही गुरूदेवांना आपल्या समस्या सांगून त्यावर उपाय विचारले. पहिल्याने विचारले, ‘‘महाराज सध्या माझी फार आर्थिक ओढाताण होते आहे. मी जास्त पैसा मिळवण्यासाठी काय करू?’’ तर दुसर्याने विचारले, ‘‘महाराज!
माझे पाप नाहीसे होण्यासाठी मी काय करू?’’ त्या दोघांचेही ते दोन्ही प्रश्न ऐकले आणि त्यावर थोडा विचार करून गुरूदेव त्यांना म्हणाले, तुमच्या समस्येवरचा उपाय आहे ‘काम आणि राम.’ ‘‘काय काम आणि राम? म्हणजे नेमकं काय?’’ त्यांनी विचारले.
तेव्हा ज्याने महाराज मी पैसे मिळण्यासाठी काय करू, असे विचारले होते. त्याला समजावीत महाराज म्हणाले की, ‘बाबारे! कामाशिवाय दाम आणि घामाशिवाय मोती मिळत नाहीत. तू तुला जे आणि जेवढं जास्तीत जास्त काम करता येईल तेवढं कर आणि अधिकाधिक धन कमव. उद्योगाचे घरी देवता लक्ष्मी वास करी, हे विसरू नकोस.
जो कष्ट करतो, घाम गाळतो, मेहनत करतो. त्याच्यावर श्रमलक्ष्मी कृपा करते. आळशी व्यक्तीवर नाही, तर जो प्रयत्नशील आहे, कार्यरत आहे, कामदार आहे, सच्चा आहे, प्रामाणिक आहे त्याच्यावर देवी लक्ष्मी कृपा करते. दैन्य दारिद्य्र दूर करण्याचा उपाय एकच आहे तो म्हणजे कष्ट, काम.
मग दुसर्या शिष्याकडे वळत महाराज म्हणाले की, बाबारे! तुला तुझ्या पापाचा क्षय व्हावा आणि पुण्याची शिदोरी वाढावी असे वाटते आहे ना? मग तू एकच कर, सतत रामनामाचा जप कर. रामाचे नाम हे सर्व पापांचा नाश करणारे आणि पदरी पुण्याची शिदोरी बांधून देणारे आहे. ज्या प्रमाणेे एखादी छोेटीशी गवताची काडी ही गवताची मोठ्यातली मोठी पेंढीही जाळून त्याची राख करते.
तशी अद्भुत शक्ती ही त्या रामनामात आहे. रामनामानेच वाल्याचा वाल्मिकी झाला. रामनामाच्या शक्तीवरच पाषाण पाण्यात तरले. अनेक पापी दुष्ट दुराचारी ह्यांचा उद्धार झाला, ही गोष्ट विसरून कशी चालेल. दोघांनीही तो काम आणि राम हा उपाय पटला. तोच गुरू उपदेश आचरणात आणून ते दोघेही सुखी, समाधानी झाले.