पुणे – परगावी असलेल्या भावाला वेळेत राखी पोहोचणे बहिणीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. हीच भावनिक गरज ओळखून टपाल खात्याने “राखी पाकीट’ ही विशेष सोय केली आहे. शहर आणि जिल्ह्यातील सर्व टपाल कार्यालयांमध्ये ही पाकिटे मिळणार आहेत. भावाने बहिणीला किंवा बहिणीने भावाला अनोखी भेट देण्यासाठी “माय स्टॅम्प’ची सुविधा देखील शहरातील मुख्य टपाल कार्यालयांमध्ये सुरू राहणार आहे.
डिजीटलचे युग असले, मोबाइलवर शुभेच्छा संदेश पाठवण्याची सोय असली तरी राखी ही राखीच असते. त्यामुळे परगावी असलेल्या भावाला वेळेत मिळणे ही बहिणींसाठी समाधानकारक आणि आनंददायक गोष्ट असते. त्यामुळे पोस्टाने राखी पाठवण्याचे प्रमाण कमी झाले नाही किंबहुना वाढलेच आहे. परंतु अनेकदा राख्यांची पाकिटे अन्य पाकिटांमध्ये मिसळली जातात आणि सण होऊन गेल्यानंतर ते मिळतात किंवा कधी कधी गहाळही होतात.
याविषयी आलेल्या अनेक तक्रारींवर उपाय म्हणून टपाल विभागाने राखीचे पाकीट सगळ्यात उठून दिसावे. या उद्देशाने गेल्या काही वर्षांपासून राखीचे स्वतंत्र पाकीट उपलब्ध केले आहे. या पाकिटावर पोस्टाचा छापील स्टॅम्प असून, एका पाकिटाची किंमत दहा रुपये आहे. पोस्टाच्या राखी पाकिटांनाही दर वर्षी महिलांचा प्रतिसाद वाढत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
पुणे क्षेत्रातील पुणे, नगर, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांतील टपाल खात्याच्या कार्यालयात ही सुविधा उपलब्ध आहे. तसेच शहरातील मुख्य टपाल कार्यालयांमध्ये “माय स्टॅम्प’ योजनेअंतर्गत नागरिकांना प्रिय व्यक्तीचे पोस्टाचे तिकीट छापून घेण्याचा उपक्रमही सुरू आहे.
“राखी पाकीट वेळेत पोहोचवण्यासाठी सर्व टपाल कार्यालयांमध्ये सूचना देण्यात आल्या आहेत. पोस्टाच्या राखी पाकिटांना नागरिकांचा दर वर्षी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ग्राहक स्पीड पोस्टाने देखील राखी पाठवू शकतात. परदेशातही राखी जलद आणि वेळेवर पोहोचू शकते. पावसाचा विचार सर्व लिफाफे वॉटरप्रूफ करण्यात आले आहेत. टपाल विभागाच्या अधिकृत पाकिटावर लिहिलेल्या “राखी’ या शब्दामुळे त्याचे वर्गीकरण सोपे झाले आहे, “- बाळकृष्ण एरंडे, अधीक्षक, पुणे टपाल ग्रामीण विभाग