पं. विजयशास्त्री जोशी
दीपोत्सवाची सुरुवात दिवाळीच्या पूर्वसंध्येला गेल्या वर्षीचा दिवा उजळवून केली जाते. याला “यमाचा दिवा’ असे म्हणतात. परंपरेने चालत आलेल्या बाबी आम्ही पुढे सुरू ठेवत आहोत, असा त्याचा अर्थ असतो. त्यानंतर नवे दिवे उजळवीत असताना आपण स्वतःला प्रश्न विचारायचा आहे. मानवी मूल्यांची जी परंपरा आपल्याकडे परंपरेने चालत आली आहे, ती आपण किती अबाधित ठेवली आणि त्यात कोणती भर घातली, हा तो प्रश्न होय.
घरात-दारात, अंगणात आणि चौकाचौकात रेखाटलेल्या रांगोळ्या आणि ओळीने तेवणारे दिवे. प्रकाशाची एकेक आवर्तने जोडत अनंतापर्यंत पसरलेल्या प्रकाशशलाका. दिवाळीचे हे चित्र हजारो वर्षांपासून आपण पाहत आहोत आणि पुढेही हजारो वर्षे ते तसेच राहणार आहे. परंपरा यालाच म्हणतात. तिची सुरुवात आणि शेवट याबाबत कुणालाच माहीत नसते. परंपरेत सामील होऊनच आपण मनुष्यत्व टिकवू शकतो, एवढेच माहीत असते. सर्व सणवारांचा हाच संदेश असतो आणि दिवाळीही तोच संदेश देते. किंबहुना दिवाळी हा संदेश अधिक प्रकर्षाने अधोरेखित करते. दिवाळी साजरी करण्याचे एक विशिष्ट कारण आहे. ती उगाचच येत नाही. म्हणूनच दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे विशिष्ट महत्त्व आहे.
सर्वप्रथम दिवाळीला येण्याचे आमंत्रण दिले जाते. पूर्वेकडील राज्यांत या आमंत्रणाला “यम का दिया’ असे नाव आहे. दिवाळीच्या एक दिवस आधी हा यमाचा दिवा उजळविला जातो आणि तिथून दिवाळी सुरू होते. परंपरेची माहिती असणारी घरातील आजी किंवा ज्येष्ठ व्यक्ती आपल्याला यमाच्या दिव्याची महती सांगू शकेल. यमाचा दिवा उजळविण्यासाठी नेहमी मातीच्या जुन्या पणतीचाच वापर केला जातो. गेल्या वर्षी दिवाळीत जी पणती घरात, अंगणात उजळविली असेल, तीच यमाचा दिवा म्हणून उजळविली जाते. घरात किंवा अंगणात गेल्या वर्षीच्या दिवाळीत अखेरपर्यंत जो दिवा जळत राहतो, तो यावर्षीच्या दिवाळीपर्यंत जपून ठेवला जावा, असा रिवाज आहे. दिवाळीच्या आदल्या रात्री तो दिवा उजळविला जातो आणि दिवाळीच्या पूर्वसंध्येपासून दीपोत्सवाची सुरुवात होते.
यमाच्या दिव्याचा अर्थ असा की, मागील वर्षीचे जे आहे ते जीवित व्यक्ती पुढे चालवीत आहेत. काहीही नव्याने करण्यात येत नसून, मागील परंपराच पुढे नेण्याचे काम सुरू आहे. परंतु हा यमाचा दिवा अंगणातून पुन्हा घरात आणला जात नाही. तो तसाच बाहेर ठेवला जातो. याचा अर्थ परंपरेने जे चालत आले आहे, ते पुढे घेऊन जायचे आहे. आपल्याकडून त्यात भर घालायची आहे. परंपरा केवळ रूढी बनून राहू नयेत, तर पुढील पिढीने आपल्या प्रतिभेने आणि परिश्रमाने काही नवीन भर घालावी, अशी अपेक्षा दिवाळीतील नवे दिवे या जुन्या दिव्याकडून व्यक्त करीत असतात. दीपावलीच्या या अर्थामध्ये वर्षानुवर्षे सुरू असलेल्या परंपरेत नवे अर्थ, नवे जीवन भरण्याचे आव्हान अपेक्षित आहे.
यंदाच्या दिवाळीत आपण नवे दिवे उजळवत असताना स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे. परंपरेने मानवी मूल्यांची जी मशाल आपल्या हाती सोपविली आहे, ती आपण किती अबाधित ठेवली आणि आपल्या सर्जनशीलतेने त्यात काय नवीन भर घातली? गरिबी, भ्रष्टाचार, हिंसा, अविश्वास, अहंकार आणि स्वार्थाच्या अंधकाराच्या विरोधात समृद्धी, प्रामाणिकपणा, प्रेम, भरंवसा, परोपकार आणि त्यागाचा प्रकाश निर्माण करण्यात आपले योगदान किती? ही परंपरा आपण आपल्या वर्तणुकीतून पुढे सुरू ठेवतो आहोत का? या प्रश्नांची उत्तरे आपण स्वतःला या दिवाळीत देऊ या. दीपावलीच्या सर्वांना लक्ष लक्ष शुभेच्छा!