खड्डे वाचवण्याच्या नादात वाहनांचे टायर फुटले
पाणी साठल्याने पाण्याची डबकी तयार झाली
संगमनेर (प्रतिनिधी) – पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे मोठे खड्डे पडले आहेत. तसेच, त्यात पाणी साचून राहिल्याने पाण्याची डबकीच तयार झाली आहेत. त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा येत असून, वाहनचालकांना धोकादायक स्थितीतून नेमका कोणता खड्डा चुकवायचा यासाठी कसरत करावी लागत आहे. खड्डे वाचवण्याच्या नादात वाहनांचे टायर फुटण्याच्या घटना घडत आहेत.
संगमनेर शहरासह आसपासच्या ग्रामीण भागात पावसाने मुक्काम ठोकलेला आहे. त्यामुळे तालुक्यातून जाणाऱ्या पुणे-नाशिक महामार्गावर कर्हे घाट ते आळेखिंड पर्यंतच्या रस्त्यावर खड्ड्यांचे प्रमाण अधिक आहे. संगमनेर शहर बाह्यवळण रस्ता, चंदनापूरी घाट, डोळासणे उड्डाणपुल, एकल घाट, आंबीखालसा फाटा, बोटा बाह्यवळण या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा खड्डे आहेत. येथील खड्ड्यांत वाहने आदळून अपघात होत आहेत.
खड्डेयुक्त महामार्ग असल्याने चालकांना प्रश्न पडतो की, नेमका कोणता खड्डा चुकवायचा. वेगात वाहन असल्यास टायरसह स्टेपनीचाही चांगलाच बेंड निघतो. खड्डे वाचवण्याच्या नादात अपघातही घडत आहेत. संगमनेर शहर बाह्यवळण रस्ता, बोटा बाह्यवळण, एकल घाट येथे मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्डयांमुळे वाहनांचे टायर फुटण्याच्या घटना शुक्रवारी रात्री घडल्या. रात्रीच्यावेळी प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना या खड्ड्यांचा अंदाज येत नाही. यामुळे मध्यरात्री दिवाळीसाठी पुण्याकडून नाशिककडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या 16 गाडयांचे टायर फुटले. त्यामध्ये आयट्वेन्टी, व्हेन्टो, व्हॅगनआर, मर्सिडिझ बेन्झ अशा गाड्यांचे टायर फुटले होते. खड्डे इतके मोठे आहेत की त्यामुळे काही गाड्यांचे दोन टायर फुटले. स्टेपनीला एकच टायर असल्याने वाहनचालकांना पंक्चर झालेली कार टो करून न्यावी लागत आहे. पुणे-नाशिक महामार्ग कायमच या ना त्या गोष्टींमुळे चर्चेत राहतो. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून या रस्त्याकडे कायमच दुर्लक्ष झाल्याने या रस्त्याचे काम मुदत संपून तीन वर्ष झाल्यानंतरही पूर्ण झालेले नाही.
आता पावसामुळे खड्ड्यांचा महामार्ग बनला आहे. त्यामुळे या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
सततच्या पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडले आहेत. पाऊस थांबल्यावर तातडीने खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. आमच्याकडून तात्पुरत्या उपाययोजना केल्या जात आहे.
दिलीप शिंदे
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रोजेक्ट व्यवस्थापक.
कुटुंबासह पुणे-नाशिक महामार्गावरून नाशिकच्या दिशेने जात असताना बोटा बाह्यवळण रस्त्यावर असलेल्या मोठ्या खड्ड्यात माझी कार आदळली. खड्डा इतका मोठा होता की, गाडीचे दोन टायर फुटले. स्टेपनीला एकच टायर असल्याने मला पंक्चर झालेली कार टो करून न्यावी लागेल.
सागर खादळे
कार चालक