पुणे, {प्रभात वृत्तसेवाञ} – राज्याचे रब्बी हंगामातील पिकांखालील सरासरी क्षेत्र 53 लाख 96 हजार 969 हेक्टरइतके असून प्रत्यक्षात 58 लाख 60 हजार 169 हेक्टर (108.58 टक्के) क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. रब्बी हंगामातील प्रमुख पीक असलेल्या ज्वारीचे क्षेत्र गतवर्षापेक्षा 3 लाख 20 हजार हेक्टरने वाढले आहे. त्यामुळे ज्वारीच्या उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
कृषी आयुक्तालयाने रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीचा अहवाल नुकताच अंतिम केला आहे. त्यामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. राज्यात रब्बी हंगामातील पेरण्यांनी सरासरी ओलांडली असून ही समाधानकारक बाब आहे. मात्र, संरक्षित सिंचनाची सोय कमी असून राज्यातील काही भागात दुष्काळाची स्थिती आहे. त्याचा परिणाम उभ्या पिकांवर होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.
राज्यात उत्तम प्रतिच्या ज्वारीचे दर प्रति किलोस 50 ते 75 रुपयांपर्यंत वधारले होते. या दरवाढीमुळेही ज्वारीचा पेरा वाढण्यास मदत झाली. यामुळे ज्वारीचे वाढलेले दरही आवाक्यात येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान, काही भागात रब्बी ज्वारीच्या काढणीस सुरुवात झालेली आहे.
कृषी विभागाच्या प्रयत्नांना यश
ज्वारीला मिळत असलेला अधिक दर आणि जनावरांच्या चार्यासाठी शेतकर्यांनी ज्वारी पिकाच्या पेरणीस प्राधान्य दिले. तृणधान्यांचे अधिक महत्व अधिकाधिक शेतकर्यांपर्यंत नेण्याचा प्रभावी प्रचार कार्यक्रम कृषी विभागाने राबविला. त्यामुळे ज्वारी पेरणीकडे शेतकर्यांचा कल पुन्हा वाढविण्यास यश आल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.