नवी दिल्ली – नवीन बिहार घडवण्यासाठी बिहारच्या सरकारमध्ये बदल घडवण्याची गरज आहे आणि त्यासाठी मतदारांनी कौल द्यावा असे आवाहन कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केले आहे. बिहार मध्ये येत्या बुधवारी पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी यांनी आज चार मिनीटांचा एक व्हिडीओ संदेश जारी केला. त्यात त्यांनी हे आवाहन केले.
बिहार मधील नितीशकुमार सरकारने कोणतेही चांगले काम केलेले नाही असे नमूद करून सोनिया गांधी यांनी म्हटले आहे की, या सरकारमुळे कामगार असाह्य झाले असून, शेतकरी आणि युवक कमालीचे निराश झाले आहेत.
तेथील सत्ताधाऱ्यांना सत्तेची नशा चढली असून त्यातून त्यांच्यात मोठा अहंकारही निर्माण झाला आहे. त्यांची प्रत्येक कृती आणि शब्द संशयास्पद बनले आहेत. त्या राज्याच्या बिघडलेल्या अर्थव्यवस्थेचा मोठा फटका तेथील लोकांना बसत आहे असे त्यांनी म्हटले आहे.
बिहार मधील दलित आणि महादलित उद्धवस्त झाला असून समाजातील अन्य मागास घटकांनाहीं या सरकारमुळे मोठे नुकसान सोसावे लागले आहे असा आरोपही सोनियांनी केला. बिहारची जनता महागठबंधनच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे असा दावाही त्यांनी केला. बिहार मध्ये आता बदल करण्याची वेळ आली आहे, दहशत आणि गुन्ह्यांच्या आधारे सरकार स्थापन करता येणार नाही असेहीं त्यांनी नमूद केले.