लखनौ – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आत्मनिर्भार निधी म्हणजेच पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत ज्या फेरीवाल्यांना आणि रस्त्यावरील विक्रेत्यांना बॅंकांमार्फत कर्ज मिळाले त्या लाभार्थ्यांशी आज व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधला.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, फेरीवाल्यांच्या कष्ट आणि प्रामाणिकपणाला आम्ही या योजनेद्वारे सन्मान दिला असून पूर्वी बॅंकांमधून गरिबांना कर्ज मिळत नसत पण आम्ही त्यांना ही संधी याद्वारे उपलब्ध करून दिली आहे.
ते म्हणाले की गरिबांच्या नावाखाली राजकारण करणाऱ्यांनी गरिबांना कर्ज दिले तर त्याची परतफेड होणार नाही असे भीतीचे वातावरण निर्माण केले होते. आज बॅंकिंग सिस्टीमशी देशातील गरीब जोडला गेला आहे. फेरीवाल्यांना त्यातून मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध होत असून त्याची परतफेडही वेळेत होत आहे.
भ्रष्टाचारात गुंतलेल्यांनी नेहमीच गरिबांवर अप्रामाणिकपणाचा आरोप करीत त्यांना कर्जापासून वंचित ठेवले असा आरोपही त्यांनी केला. तथापि, या देशातील गरीब माणसाने कधीच प्रामाणिकपणा आणि आत्मसन्मानाशी तडजोड केली नाही. उत्तरप्रदेशातील अनेकांना स्वनिधी योजनेतून कर्ज मिळाले असून त्याची ते प्रामाणिकपणे परतफेड करीत आहेत.
आमच्या सरकारने जेव्हा जनधन योजना सुरू केली, त्यावेळी ही योजना गरिबांच्या कल्याणासाठी कशी सहाय्यभूत होणार असा प्रश्न उपस्थित करून योजनेची थट्टा केली होती. पण या योजनेमुळेच गरिबांना बॅंकिंग सेवेची दारे खुली झाली असे पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले.
पीएम स्वनिधी योजना यावर्षी 1 जूनला सुरू झाली. त्यासाठी देशभरातून एकूण 25 लाख अर्ज आले त्यापैकी 12 लाख लोकांना कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे, अशी माहितीही पंतप्रधानांनी यावेळी दिली.