अरुण गोखले
परवा एक तीनच शब्दांचा पण खूप सुंदर असा जीवनसंदेश वाचायला मिळाला. तो असा होता, जीवनात या तीन गोष्टींवर लक्ष द्या. “विचार, उच्चार आणि आचार’ या तीनच शब्दांतून त्या संदेशदात्याला नेमकं काय सांगायचं, सुचवायचं असेल? याचा जेव्हा बारकाईने विचार केला, तेव्हा त्या त्रिसूत्रीतले नेमके मर्म काय ते लक्षात आले. तुम्हाआम्हा आपल्या प्रत्येकालाच आपलं जीवन कसं आहे, ते कसं असावं आणि ते जसं हवं असं वाटतय, तसं कसं करता येईल याचा आपापल्या पातळीवर विचार करावा लागतो. आपले विचार हेच आपल्या कार्याची, कामाची दिशा ठरवीत असतात, “विचार बदला जीवन बदलेल’, असं जे सांगितलं जात ते ह्यासाठीच.
कारण आपल्या मनात पाण्याच्या लाटे प्रमाणे एकसारखे एकामागून एक असे अनेक विचार येत असतात. ही विचारप्रक्रिया सतत सुरू असते. विचार बळावले की ते विचार आपल्या उच्चारातून म्हणजेच बोलण्यातून बाहेर पडतात. त्यांच चांगल वाईट स्वरूप हे त्या मागच्या विचारांवरच अवलंबून असते. आपल्या उच्चारलेल्या, बोललेल्या शब्दातूनच आपल्या भाव भावना व्यक्त होत असतात. त्या बोलण्याने आपण कळत नकळत कोणाशी आपले स्नेहसंबंध जोडत जातो तर कधी तोडत.
यासाठीच विचार करून बोला असा जो सल्ला दिला जातो तो मोलाचा हेच खरं. एकदा शब्द तोंडातून बाहेर पडला की तो धनुष्यातून सुटलेल्या बाणासारखा असतो, तो मागे घेता येत नाही. म्हणूनच बोलण्या आधीच उत्तम, सकारात्मक आणि सारासार विचार करणे फार महत्त्वाचे असते. चांगल्या विचाराचे प्रगटीकरण हे चांगल्या शब्दात होते, ते शब्द आपल्या बरोबरच इतरांनाही सुखवून समाधान देऊन त्यांच्याशी एक नवं स्नेहाचं नातं जोडून जात असतात. आपले विचार, उच्चार आणि आचार ह्यात एक सुसंगतपणा असावा लागतो.
तिसरा शब्द म्हणजे आचार. आचार म्हणजे कृती, वर्तन, वर्तणूक किंवा वागणूक. आपले वर्तन हे नेहमीच चांगले असायला हवे. कारण त्यावरच आपले इतरांशी असणारे नातेसंबंध अवलंबून असतात. मोठ्यांचे वर्तन हाच छोट्यांचा आदर्श असल्याने मोठ्यांनी याबाबत नेहमीच खबरदारी घ्यावी लागते. जीवनात जेव्हा अशा विचार, उच्चार आणि आचार ह्यांची उत्तम सांगड घालणारी माणसे आपण पाहतो, तेव्हा न कळतच बोले तैसा चाले, त्यांची पावले विनयाने वंदन केली जातात.