-अरुण गोखले
तलवारीच्या धाकावर राज्य जिंकता येतं, भूप्रदेश काबीज करता येते. पण जर कुणाचं मन जिंकायचं असेल, कुणाच्या मनात आपल्यासाठी जागा तयार करायची असेल, तर त्यासाठी मात्र प्रेमच कामास येते. निर्भळ, निष्कपट आणि निर्लोभी प्रेम हेच व्यक्ती व्यक्तींना जवळ आणते. त्यांच्यात असलेले नातं अधिक घट्ट करते आणि कित्येकदा तर नसलेलं नातं ही नव्याने प्रस्थापित करून मन आणि मनाबरोबरच माणसं जोडण्याचं कामही प्रेमच करते.
जर तुम्हाला कुणास प्रेम देता आलं आणि घेता आलं ना, तर तुमच्यासारखा जगातला अन्य सुखी माणूस दुसरा कोणी नाही. प्रेमाचं एक वैशिष्ट्य आहे, प्रेम हे केवळ देणं जाणतं, त्याला स्वार्थ किंवा घेणं हे माहीत नाही.
आपल्याला हे असं निरपेक्ष, निखळ प्रेम करता यायला हवं. त्याग ही त्या प्रेमाची खरी कसोटी आहे. आपल्या कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात अशा प्रेमाची नितांत गरज आहे. आई-मुलांचं प्रेम, बहीण-भावाचं प्रेम, मित्र-मैत्रिणीचं प्रेम हे असं निखळ आणि निरपेक्ष असायला हवं. कारण जर व्यक्ती व्यक्तीच्या मनात असे शुद्ध निर्मळ, निरपेक्ष प्रेम असेल तर त्यांच्यामध्ये आस्था, आदर, जिव्हाळा, ओढही आपोआप निर्माण होते. तिथे न मागता दोन व्यक्ती परस्परांच्या सुख-दु:खाच्या वाटेकरी होतात. या प्रेमाचे धडे बालपणापासून द्यायला आणि गिरवायलाही हवेत.प्रेमाचा विषय निघाला की संत कबीरदासांच्या वचनाची आठवण झाल्याशिवाय राहात नाही. ते म्हणतात, ढाई अक्षर प्रेम के, पढे सो पंडीत होय.
प्रेम हा एक एवढासा अडीच अक्षरांचा शब्द; पण त्यानेच सारे विश्व व्यापून टाकलेले आहे. कुटुंबातील आई-वडील ही प्रेमाची मूर्तिमंत उदाहरणे आहेत. तर परमार्थात सर्वांवर आणि तेही सारखंच प्रेम करायला आपल्याला साधू, संत, सत्पुरुष आणि सद्गुरू हे सांगतात आणि शिकवतातही. त्यांचा “प्रेम द्या रे, प्रेम घ्या रे’ हा प्रेमाचा पाठ आपण घ्यायला हवा आणि तो सुख-समाधानी जीवनासाठी गिरवायलाही हवा. कारण ते जर झाले तरच ज्ञानदेवांना अभिप्रेत असलेले विश्वबंधुत्वाचे नाते प्रस्थापित होतं. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, ही त्यांची पसायदानातील अपेक्षा पूर्ण होईल. मानवतेच्या नात्याने सर्वांना एकत्र जोडण्याची विलक्षण ताकदही त्या प्रेमधाग्यात आहे.