– अरुण गोखले
जीवनामध्ये अनेक वेळा लहान-मोठ्या सर्वच थरातल्या व्यक्तींना केव्हा ना केव्हातरी “मन लाव, मनापासून कर. मन लावून कर’, हा सल्ला मिळालेला असतोच. “मन लाव’ या दोन शब्दांच्या सल्ल्याला खरं तर खूप मोठा अर्थ आहे. पण आपण तो मनावर घेत नाही हीच खेदची बाब आहे.
लहान मुलांना तर अभ्यासाच्या बाबतीत आपल्याला वारंवार हे सांगावे लागते की, अरे जरा मन लावून वाच, मन लावून अभ्यास कर.
आता नेमकं हे मन लावायचं म्हणजे काय करायचे, असा जर मुलाने किंवा एखादे वेळी मोठ्यांनी आपल्याला प्रश्न विचारला, तर आपल्याला त्यांना हेच सांगावे शिकवावे लागते की,
बाबारे! मन लावायचं म्हणजे आपण जे काही लेखन, वाचन, पाठांतर करतो आहे ना, त्यावर पूर्ण लक्ष द्यायचे. त्याबाबत एकाग्रता साधायची. त्या वेळी इतर कोणत्याही गोष्टींचा मनात विचार करायचा किंवा आणायचा नाही. तसं जर केलं, मन शांत स्थिर आणि एकाग्र केलं, तर आपण केलेले लेखन हे निर्दोष होते. त्यात चुका, खाडाखोड होण्याची संभावना कमी असते. केलेले पाठांतर लक्षात राहायला मदत होते.
जी गोष्ट अभ्यासाची तीच कामाचीही. काम करत असताना त्यात मन लावले. ते मनापासून केले तर ते निश्चितच चांगल्या दर्जाचे आणि वेळेवर होते. त्यात चुका होत नाहीत. उणिवा राहात नाहीत. विलंब होत नाही. चांगल्या आणि गुणवत्तापूर्वक झालेल्या कामांचे इतरांकडून कौतुक होते. त्यामुळे आपला उत्साह, क्षमता, जोर वाढतो.
मनाची एकाग्रता ही अभ्यास, काम, खेळ, ध्येयपूर्ती या सगळ्याच ठिकाणी आवश्यक असते. आपल्या प्रयत्नांच्या सातत्यातसुद्धा या मन लावण्याच्या कृतीने आपला फायदाच होतो. आपल्याला त्या गोष्टीत रस वाटू लागतो. त्याची गोडी वाटते, त्यात आपले मन रमायला लागते. त्या विषयाबद्दल, कामाबद्दल, ध्येयाबद्दल ओढ निर्माण होते आणि नकळतच आपल्या त्या कार्याला उत्तम गती येते. मन लावण्याची ही कला आपल्याला हळूहळू एकदा का साधली, की मग सारं कसं अगदी मनासारखं सुरळीत होतं.