– आशिष निनगुरकर
चित्रपट म्हणजे केवळ मनोरंजनच नव्हे, तर समाजप्रबोधनाचंही उत्तम माध्यम आहे. वेगवेगळ्या विषयांवर आधारित अनेक चित्रपट बनत असतात. त्यातील काही चित्रपट सत्यघटनेवर आधारित आहेत. अशा चित्रपटांवर टाकलेला दृष्टिक्षेप…
“शेरशाह’ या चित्रपटाची कथा लोकांना खूप आवडली. हा चित्रपट ऍमेझॉन प्राइम व्हिडिओच्या सर्वाधिक पाहिलेल्या चित्रपटांपैकी एक बनला आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट समीक्षकांनाही आवडला. हा चित्रपट कारगिल युद्धातील शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या आयुष्यावर आधारित आहे, जे युद्धादरम्यान शहीद झाले होते. ही कथा विक्रम बत्रा यांचे जीवन, त्यांचे देशावरील प्रेम आणि डिंपल यांचे चित्रण करते. यात सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहेत.
प्रसिद्ध गीतकार गुलजार यांची मुलगी मेघना गुलजार यांनी दिग्दर्शित केलेला “छपाक’ ऍसिड हल्ल्यातून वाचलेल्या लक्ष्मी अग्रवालच्या जीवनावर आधारित होता. दीपिका पदुकोनने या चित्रपटात लक्ष्मीची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात अभिनेता विक्रांत मिस्सी आणि रोहित सुखवानी मुख्य भूमिकेत होते.
गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल हा चित्रपट देशातील पहिल्या महिला एअरफोर्स पायलटच्या जीवनावर आधारित आहे. गुंजन सक्सेना कारगिल युद्धादरम्यान भारतीय हवाई दलात पायलट होत्या. त्यांनी 1999मध्ये युद्धाच्या वेळी भारतीय सैन्याला मदत केली आणि जखमी सैनिकांची सुटका केली. या चित्रपटात जान्हवी कपूर, पंकज त्रिपाठी आणि अंगद बेदी मुख्य भूमिकेत आहेत.
“सुपर 30′ हा एक चरित्रात्मक चित्रपट आहे. चित्रपटाची कथा आनंद कुमार या प्रसिद्ध शिक्षकाच्या जीवनावर आधारित आहे. बिहारमधील गरीब मुलांना सुपर 30 कोचिंग चालवणारे प्रसिद्ध शिक्षक व त्यांचे जीवन यात चितारले आहे. यात हृतिक रोशन आणि मृणाल ठाकूर मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाने 146 कोटी रुपयांचा व्यवसाय केला.
“सरबजीत’ हा चित्रपट पाकिस्तानातील भारतीय कैदी सरबजीतच्या जीवनावर आधारित होता. या चित्रपटात सरबजीत सिंग आणि त्याच्या कुटुंबाचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. सरबजीत याला पाकिस्तानने हेरगिरी, दहशतवादाच्या आरोपाखाली तुरुंगात डांबले. या चित्रपटात रणदीप हुड्डा आणि ऐश्वर्या राय मुख्य भूमिकेत होते.
मराठीतील “माझं घर माझा संसार’ हा चित्रपट मुंबईमध्ये घडलेल्या सत्यघटनेवर आधारित असल्याचे सांगण्यात येतं. “दृष्ट लागण्याजोगे सारे’ हे लोकप्रिय गाणं आणि या गाण्यामधली गोड अभिनेत्री सर्वांनाच आठवत असेल. या चित्रपटामध्ये एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारं एक जोडपं घरगुती कटकटीला कंटाळून ट्रेनमधून उडी मारून आत्महत्या करते; परंतु नवरा मरतो आणि बायको जिवंत राहते.
“लालबाग परळ’ हा चित्रपट मुंबईतील गिरणी कामगारांच्या जीवनावर आधारित आहे.
मुंबईतील गिरणी कामगारांच्या समस्या हा विषय काही महाराष्ट्रातील जनतेसाठी नवीन नाही. लाखो गिरणी कामगारांनी उपजीविकेचे साधन गमावल्यावर त्यांची आणि पर्यायाने त्यांच्या कुटुंबाची झालेली फरफट, न्यायासाठीची धडपड आणि राजकारण्यांसोबतचा लढा अशा अनेक मुद्द्यांवर या चित्रपटात प्रकाश टाकण्यात आला आहे.
महेश मांजरेकर दिग्दर्शित या चित्रपटात सचिन खेडेकर, सिद्धार्थ जाधव, अंकुश चौधरी, विणा जामकर, सई ताम्हणकर, कश्मिरा शहा, सतीश कौशिक, विनय आपटे, सीमा विश्वास अशा नामवंत कलाकारांच्या भूमिका आहेत.
“माफीचा साक्षीदार’ हा चित्रपट पुण्यामध्ये 1976-77 साली घडलेल्या जोशी-अभ्यंकर खून खटल्यावर आधारित होता. दीड वर्षात 10 खून आणि कित्येक दरोड्यांचा घटनांची शृंखला असा अंगावर शहारा आणणाऱ्या जोशी-अभ्यंकर खून खटल्याने त्यावेळी केवळ पुणंच नाही, तर अख्खा महाराष्ट्र हादरला होता. राजदत्त दिग्दर्शित या चित्रपटात नाना पाटेकर, मोहन गोखले, अविनाश खर्शीकर, उषा नाईक हे कलाकार मुख्य भूमिकेमध्ये होते.
2019 मध्ये आलेला “बंदिशाळा’ हा चित्रपट सत्यघटनेवर आधारित होता. एका कर्तव्यदक्ष तुरुंग अधिकारी असणाऱ्या महिलेची कथा यामध्ये दाखवण्यात आली होती. या चित्रपटाला महाराष्ट्र राज्य शासनाच्या 56व्या मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वाधिक पुरस्कार देण्यात आले.
चित्रपटाचे लेखक आहेत “जोगवा’, “पांगिरा’ अशा दर्जेदार चित्रपटांचे लेखक-प्रस्तुतकर्ते व राष्ट्रीय पुरस्कार विजेते (दशक्रिया-उत्कृष्ट पटकथा) संजय कृष्णाजी पाटील, तर दिग्दर्शक होते मिलिंद लेले. चित्रपटामध्ये मुक्ता बर्वे आणि शरद पोंक्षे प्रमुख भूमिकेत असून प्रवीण तरडे, माधव अभ्यंकर, विक्रम अभ्यंकर महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
अशोक व्हटकर यांच्या “72 मैल एक प्रवास’ याच नावाच्या कादंबरीवर आधारित “72 मैल एक प्रवास’ या चित्रपटामध्ये सातारा येथील एका बोर्डिंग स्कूलमध्ये राहून शिकणाऱ्या अशोक या 13 वर्षांच्या मुलाची सत्यकथा दाखवण्यात आली आहे. हॉस्टेलमधल्या कडक शिस्तीला कंटाळून हा मुलगा तिथून पळून कोल्हापूरला आपल्या गावी जात असताना, वाटेत त्याला आयुष्याचा धडा मिळतो. या चित्रपटाचे दिग्दर्शक होते राजीव पाटील. चित्रपटात चिन्मय पंत आणि स्मिता तांबे प्रमुख भूमिकेत आहेत.
भारतात विशेषतः पुण्यामध्ये आलेली प्लेगची साथ रोखण्यासाठी नियुक्त करण्यात आलेले ब्रिटिश अधिकारी सी. डब्ल्यू. रॅंड याने प्लेगच्या साथी दरम्यान केलेल्या अत्याचारांमुळे समाजात प्रचंड असंतोष पसरला होता. यामुळेच चापेकर बंधू- दामोदर हरी, वासुदेव हरी आणि बाळकृष्ण हरी आणि महादेव विनायक रानडे आणि खंडो विष्णू साठे यांनी त्याचा वध केला. “22 जून 1897′ हा चित्रपट या घटनेवर आधारित आहे.
1982 साली प्रदर्शित झालेला “अत्याचार’ हा चित्रपट दया पवार यांच्या “बलुतं’ या आत्मचरित्रावर आधारित होता. दलित समाजातील एका तरुणाच्या लढाईची कथा दाखवण्यात आली आहे. त्याकाळातील समाजाची मानसिकता, अंधश्रद्धा यामुळे अंधाराच्या खोल दरीत अडकलेल्या आणि त्यातून सुटण्यासाठी धडपडणाऱ्या तरुणाने, समाज आणि स्वत:सोबतच केलेला संघर्ष यामध्ये चित्रित करण्यात आला आहे. त्यातून समाजाचा उथळपणा खूप खोलवर दिसून येतो.
मराठीत गाजलेला “सैराट’ हा चित्रपटदेखील सत्यघटनेवर आधारित असल्याच्या चर्चा तेव्हा रंगल्या होत्या. केसरी, उरी-द सर्जिकल स्ट्राइक, पॅडमॅन, हॉटेल मुंबई, 26-11, एम एस धोनी-द अनटोल्ड स्टोरी, 83, तलवार, नो वन किल्ड जेसिका, गली बॉय, मांजा, दंगल, एअरलिफ्ट व नीरजा अशा काही सत्य घटनेवर आधारित सिनेमांची नावे प्रामुख्याने घ्यावे लागतील.