– अरुण गोखले
ज्या प्रमाणे तुमचे आमचे कुटुंब असते तसेच ते साधू, संतांचेही कुटुंब असते. आपल्या सारखीच त्यांचीही नातेवाईक मंडळी असतात. मग असं असताना त्यांच्या आणि आपल्या प्रपंच्यात फरक तो काय? या प्रश्नाचे उत्तर विचारवंत, नीतिशास्त्राचा अभ्यासक आणि लोक प्रबोधनकार आर्य चाणाक्य आपल्याला असे सांगतात की, जर आपण एखाद्या संत, माहात्म्यास विचारले की,
“तुमचे खरे कुटुंब कोणते?’ तर ते आपल्याला हेच उत्तर देतात की, “सत्य ही माझी आई आहे. ज्ञान हाच माझा पिता आहे. धर्म हा माझा भाऊ आहे. तर दया आणि क्षमा या माझ्या बहिणी आहेत. शांती ही माझी पत्नी आहे आणि सहनशीलता आणि धैर्य हे माझे पुत्र आहेत. हे सहाजण हेच माझ्या कुटुंबातले खरे माझे नातेवाईक आणि स्वकीय आहेत.’
वरकरणी जर या उत्तराचा विचार करायला गेलं तर आपल्याला ते काहीसं तुमच्या आमच्या उत्तरापेक्षा वेगळं वाटतं. ते तसं वेगळं वाटणं हेसुद्धा स्वाभाविकच आहे कारण आपल्या आणि त्यांच्या माझे कुटुंब या संकल्पनेतच मुळात खूपच फरक आहे. “तुमचं कुटुंब कोणतं?’ हाच प्रश्न जर आपल्याला कोणी विचारला तर आपण आपल्या घरातल्या आई-वडील, पती-पत्नी, मुले-मुली, भाऊ-बहिणी यांची नावे सांगतो.
साधू, संतही तीच नाती सांगतात; पण त्यात महत्त्वाचा फरक असतो की, त्यांची ती नाती ही संकुचित नसतात, तर ती व्यापक असतात. “सकल विश्व’ हेच त्यांचं कुटुंब असते. त्यांच्या लेखी केवळ जन्म देणारेच माता-पिता नसतात, तर “घर घर बाप घर घर आई’ अशी त्यांची दृष्टी व्यापक आणि विशाल असते. ते धर्माच्या माय पित्यांचाही तेव्हढाच आदर करतात. सत्य म्हणजेच जी शाश्वत अशी वात्सल्य भावना आहे, ती त्यांची आई असते. ज्ञान हाच पिता असतो.
धर्म हाच भाऊ असतो, तर दया, क्षमा हा अंतरीच्या सदवृत्ती याच बहिणी असतात. मनातली शांती हीच त्यांची पत्नी असते. जी कधी सोडून जात नाही, अंतर देत नाही. सहनशीलता, जीवनातल्या प्रत्येक प्रसंगाला धीराने तोंड देण्याचं मनोबल, धैर्य हाच त्यांचा खरा भाऊ असतो. संकुचितता आणि व्यापकता हाच त्यांच्या आणि आपल्यातला महत्त्वाचा मोठा फरक असतो.