– डॉ. मेघश्री दळवी
सध्या जागोजागी एआयची चर्चा आहे. चॅटजीपीटी आणि त्याच प्रकारची शेकडो एआय साधनं वेगाने बाजारात दाखल झालेली आहेत. हे सर्व आपल्याला नवीन आहे. त्यामुळे उत्सुकतेपोटी चॅटजीपीटीचा वापर इतका होतो की कित्येकदा तो बंद पडतो. अशा परिस्थितीत एआयमुळे पर्यावरणावरचा भार किती वाढतो आहे याचं मोजमाप आवश्यक होत आहे.
आज जगात पाच अब्ज नागरिक नियमितपणे इंटरनेट वापरतात. सर्च म्हणा की शॉपिंग, प्रत्येक ठिकाणी आता एआयचा अंतर्भाव होत आहे. त्यामुळे आपली इंटरनेटवरची प्रत्येक कृती आधीपेक्षा जास्त ऊर्जा वापरते. ऑस्ट्रेलियात झालेल्या अभ्यासानुसार एआय वापरून सर्च करताना उद्या पाच ते दहा पट जास्त ऊर्जा लागू शकते.
त्यामुळे येत्या पाच वर्षांत एआयचा कार्बन फूटप्रिंट प्रचंड वाढलेला दिसेल. एखाद्या वस्तू किंवा कृतीमुळे वातावरणात किती कार्बन सोडला जातो याच्या मोजणीला कार्बन फूटप्रिंट म्हणतात आणि वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा कार्बन फूटप्रिंट मोजणं आता अनिवार्य होत चाललं आहे.
डेटा साठवून ठेवणं, त्यावर प्रक्रिया करणं, तो वापरून एआय साधनांना ट्रेन करणं, आणि एआय साधनांकडून पुन्हा डेटा मिळत राहणं या चक्राला भरपूर ऊर्जा लागते. ऊर्जेचा वापर वाढला की साहजिकच शीतकरणाची गरज वाढते. म्हणजे पुन्हा अधिक ऊर्जा खर्च होते. मोठ्या कंपन्या आपल्या ऊर्जा वापराविषयी बोलायला नाखूश असतात.
पण इतर मार्गांनी त्याचा अंदाज येतो. शीतकरणासाठी ऊर्जा लागते तसा पाण्याचा वापरही वाढतो. गेल्या वर्षात एआय संशोधनाने जोर घेतला तेव्हा गूगलचा पाण्याचा वापर वीस टक्क्यांनी वाढलेला दिसून आला आहे. ऍलन इन्स्टिट्यूट ऑफ एआय मधल्या संशोधकांच्या मते चॅटजीपीटी सारख्या जनरेटिव्ह एआयमुळे तीन प्रकारे कार्बन उत्सर्जन होतं. पहिला प्रकार म्हणजे कॉम्प्युटर आणि डेटा सेंटर यासाठी लागणाऱ्या हार्डवेअरच्या उत्पादनामुळे वातावरणात कार्बनची भर पडते.
त्यानंतर हा डेटा वापरून शिकताना एआय साधनं प्रचंड ऊर्जा वापरतात, त्या ऊर्जा निर्मितीशी निगडीत कार्बन उत्सर्जनाची भर. तिसरा प्रकार म्हणजे आपण अशी एआय साधनं वापरतो त्यावेळी खर्च होणाऱ्या ऊर्जेमुळे वातावरणात जाणारा कार्बन. एका अहवालानुसार हगिंगफेसच्या एका एआय मॉडेलचा वापर करताना दर दिवशी सुमारे वीस किलो कार्बन उत्सर्जन होत होतं,
तेही दिवसात फक्त तेरा हजार वापरकर्त्यांकडून. तुलनाच करायची तर चॅटजीपीटीला दिवसाला एक कोटीहून अधिक वापरकर्ते आहेत. म्हणजे कार्बन उत्सर्जन किती पट होईल याची कल्पना येईल. त्यातून एआय साधनं सतत विकसित होत आहेत.
अधिक गुंतागुंतीची होत आहेत आणि अर्थात जास्त ऊर्जा वापरत आहेत. म्हणून आपण एआयचा वापर थांबवायचा का? ते आता शक्य दिसत नाही. तेव्हा शाश्वत ऊर्जास्रोत वापरून पर्यावरणावरचा कार्बनभार कमी करणं हाच यावर शाश्वत उपाय ठरेल.