टोरांटो – कॅनडासाठीच्या काही व्हिसा सेवा भारताकडून उद्या (गुरुवार) पासून पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत. कॅनडातील भारताच्या उच्चायुक्तालयाने “एक्स’ वर केलेल्या पोस्टमध्ये याबाबतची माहिती देण्यात आली आहे. एंट्री व्हिसा, बिझनेस व्हिसा, मेडिकल व्हिसा आणि कॉन्फरन्स व्हिसासाठीच्या सेवा 26 ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू होतील, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.
कॅनडातील भारतीय दूतांच्या सुरक्षिततेच्या मुद्याबाबत प्रगती झाल्यास कॅनडाबरोबरच्या व्हिसा सेवा पुन्हा सुरू करण्याचा विचार केला जात असून लवकरच याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर रविवारी म्हणाले होते. त्यानंतर याबाबतचा अधिकृत निर्णय घेण्यात आला आहे.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी सप्टेंबर महिन्यात केलेल्या आरोपांनंतर भारत आणि कॅनडादरम्यानचे संबंध बिुघडले होते. खलिस्तानी नेते हरदीप सिंग निज्जरच्या हत्येमागे भारतीय गुप्तचरांचा हात असल्याचा आरोप ट्रुडो यांनी केला होता. ट्रुडो यांचा हा आरोप भारत सरकारने सपशेल फेटाळून लावला होता.
दोन्ही देशांमधून एकमेकांच्या काही अधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर भारत सरकारने भारतात नियुक्त असलेल्या कॅनडाच्या उच्चाधिकाऱ्यांच्या संख्येत कपात करण्याचे निर्देश कॅनडाला दिले. त्यानुसार कॅनडाच्या 41 दूतांना बारत सोडून जाण्यास सांगण्यात आले.