म्युनिक, (जर्मनी) – परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री मेलेनी जोली यांची भेट घेऊन द्विपक्षीय संबंध आणि सध्याच्या जागतिक राजकीय परिस्थितीबाबत चर्चा केली.
कॅनडामध्ये झालेल्या शीख कट्टरवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येनंतर भारत आणि कॅनडादरम्यानच्या सध्याच्या ताणलेल्या संबंधांच्या पार्श्वभुमीवर त्यांनी ही चर्चा केली आहे.
जर्मनीमध्ये म्युनिक येथे आयोजित झालेल्या म्युनिक संरक्षण परिषदेच्या निमित्ताने जयशंकर आणि मेलेनी जोली यांची शुक्रवारी भेट झाली.
आमच्यातील चर्चा द्विपक्षीय संबंधावर केंद्रीत होती आणि सध्याच्या जागतिक पातळीवरील आमच्या दृष्टीकोनाचेही यावेळी आदान प्रदान झाले, असे जयशंकर यांनी सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
जयशंकर यांच्याबरोबर मनमोकळी चर्चा झाल्याचे मेलेनी यांनीही आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. हरदीप सिंग निज्जरच्या हत्येमागे भारतीय गुप्तचरांचा हात असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी गेल्या वर्षी केला होता.
तेंव्हापासून दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. कॅनडा सरकारने केलेला आरोप भारत सरकारने पूर्णपणे फेटाळून लावला असून हे आरोप पूर्णपणे बिनबुडातचे आणिविपर्यस्त असल्याचे भारताने म्हटले आहे.