Team India, Jasprit Bumrah : भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह टीम इंडियाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे, त्याच्याशिवाय मजबूत संघाची कल्पनाही करता येत नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या अचूक लाईन आणि लेन्थ बॉलिंगने दिग्गज फलंदाजांना घाम फोडणाऱ्या बुमराहने 382 विकेट्स घेतल्या आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का, की गुजरातमधून येणारा हा हिरा भारतीय संघाला सापडला नसता, जर तो भारत सोडून कॅनडामध्ये स्थायिक झाला असता, ही त्याची सुरुवातीची योजना होती. बुमराहला चांगल्या संधींच्या शोधात कॅनडाला जायचे होते आणि जर असे घडले असते तर आज आपण बुमराहला भारताविरुद्ध कॅनडाकडून खेळताना पाहू शकलो असतो.
जिओ सिनेमातील एका कार्यक्रमातील मुलाखातीत ( JioCinema )बुमराहची पत्नी संजना गणेशनने वेगवान गोलंदाजाला विचारले की, ” कॅनडाला जाऊन तेथे स्थायिक होत नवे आयुष्य सुरू करण्याचा तुझा असा काही इरादा होता का?
यावर जसप्रीत बुमराह म्हणाला की, “आपण यापूर्वीही हे संभाषण केले आहे. प्रत्येक मुलाला मोठे होऊन क्रिकेट खेळायचे असते. येथे प्रत्येक गल्लीत 25 खेळाडू आहेत, ज्यांना भारताकडून खेळायचे आहे. तुमच्याकडे बॅकअप योजना असणे आवश्यक आहे. आमचे नातेवाईक तिथे राहतात. माझे काका तिथे राहतात, त्यामुळे मला वाटले की माझे शिक्षण पूर्ण झाल्यावर आपण तिथे शिफ्ट होऊ. सुरुवातीला आमचे संपूर्ण कुटुंब कॅनडाला स्थलांतरित होणार होते, परंतु माझी आई सांस्कृतिक बदलासाठी तयार नव्हती. मला आनंद आहे की, मी येथे करिअर करू शकलो, अन्यथा मी कॅनडाच्या संघासाठी क्रिकेट किंवा दुसरे काहीतरी काम करत असतो. पण सध्या, मी भारतीय संघ आणि मुंबई इंडियन्सकडून खेळतोय याचा मला आनंद आहे.”
जसप्रीत बुमराहची कारकीर्द…
जसप्रीत बुमराहने 2016 साली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते, या सामन्यात त्याने दोन महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या होत्या. बुमराहने आतापर्यंत 36 कसोटी सामन्यांमध्ये 159 बळी घेतले आहेत, तर 89 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याच्या नावावर 149 विकेट्स आहेत. जसप्रीत बुमराहने 62 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळताना 74 विकेट घेतल्या आहेत. आयपीएलबद्दल बोलायचे झाले तर, बुमराह गेल्या 12 वर्षांपासून या लीगमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे आणि त्याने आतापर्यंत 125 सामन्यांत 155 बळी घेतले आहेत.