केंद्रीय गृहराज्य मंत्री जी. किशन रेड्डी
पुणे – देशातील प्रत्येक राज्यातील पोलीस तेथील नागरिकांना संरक्षण देत आहेत. तो कौटुंबिक जीवनाचा त्याग करून रात्रंदिवस जनतेच्या सेवेसाठी कार्यरत असतो. अशा कर्तव्यदक्ष पोलिसांची प्रतिमा सुधारण्यासाठी केंद्र शासन सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. याअंतर्गत प्रत्येक राज्याच्या पोलिसांसाठी विशेष कार्यक्रम तयार करण्यात आला असून, त्यासाठी केंद्र शासन भरीव निधी उपलब्ध करून देणार असल्याचे केंद्रीय गृहराज्य मंत्री जी.किशन रेड्डी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
रेड्डी यांनी पाषाण येथील पोलीस संशोधन केंद्रास भेट दिली. यावेळी रेड्डी यांनी पोलीस हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी केंद्रीय गृहराज्य मंत्री नित्यानंद राय आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
रेड्डी पुढे म्हणाले, एखाद्या पोलिसाने चुकीचे काम केले, तर नागरिकांना संपूर्ण पोलीस दलास बदनाम करू नये.सर्व राज्यांतील पोलीस वेळेची पर्वा न करता नागरिकांच्या संरक्षणाला सज्ज असतात, याकडेही नागरिकांनी दुर्लक्ष करू नये. पोलीस नागरिकांसाठी करत असलेल्या कामाची माहिती नागरिकांना मिळावी, यासाठी पुढील काळात केंद्र शासनाकडून प्रयत्न केले जाणार आहेत. दिल्लीत पोलिसांचे हुतात्मा स्माक उभारण्यात येणार असून प्रत्येकाने त्यास भेट देण्याचे आवाहन रेड्डी यांनी केले.
सिनेदृश्यांवर नाराजी…
देशातील प्रत्येक राज्यातील पोलीस उत्तम काम करत आहेत. नागरिकांच्या सेवेसाठी अहोरात्र सेवा करत आहेत, असे असतानाही काही टीव्ही मालिका आणि सिनेमांत पोलिसांची बदमानी करणारी दृश्ये दाखवली जात आहेत. त्यामुळे पोलिसांची प्रतिमा मलिन होत आहे. अशी बदनामीकारक दृश्ये दाखवू नयेत, यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करणार असल्याचे रेड्डी यांनी सांगितले.