मुंबई – राज्यात सध्या शिंदे फडणवीस पवार असं तीन पक्षांचं सरकार आहे. अजित पवार शिंदे फडणवीसांसोबत गेल्यापासून काँग्रेसचे काही आमदार देखील सत्तेत सहभागी होणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरु आहेत. आसात केंदीय मंत्री नारायण राणे यांनी देखील या शक्यतेला दुजोरा दिला आहे.
काँग्रेसचे काही आमदार आमच्याकडे येतील, असा दावा नारायण राणे यांनी केला आहे. तसेच आम्ही सर्वपक्षीय सरकार स्थापन करणार आहोत असंही ते यावेळी म्हणाले.प्रसार माध्यमांशी संवाद साधत नारायण राणे यांनी याबाबतचे वक्तव्य केले.
आघाडीत तीस पक्ष एकत्र आले, तरीही आम्हाला काही फरक पडत नाही. त्यामुळे काँग्रेस आणि शरद पवार एकत्र आले तर काय फरक पडणार आहे? असं देखील राणे यावेळी म्हणाले. आता काँग्रेसचेही काहीजण आमच्याकडे येतील, आम्ही सर्व पक्षाचं सरकार स्थापन करत आहोत असं स्पष्ट मत यावेळी नारायण राणेंनी व्यक्त केलं.
अजित पवार आणि शरद पवार यांच्या गुप्त बैठकीनंतर महाविकास आघाडीमधून राजकीय प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली होती. अशात आता नारायण राणे यांनी काँग्रेस देखील सोबत येणार असल्याचे वक्तव्य केल्याने एकच खळबळ उडाली आहे.