नवी दिल्ली : कोरोनासारख्या महाभयंकर व्हायरसच्या विळख्यात संपूर्ण जग अडकले आहे. अशातच कोरोनाच्या महामारीविरोधात लढण्याच्या पद्धतीसंदर्भात नॉन अलायन मुव्हमेंटच्या (NAM) वर्च्युअल समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी जगभरातील अनेक देशांसोबत संवाद साधताना पाकिस्तानवरही टीकास्त्र डागले आहे. पाकिस्तानवर निशाणा साधत मोदी म्हणाले की, ‘देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे, मात्र काही लोक असेही आहेत, जे दहशतवादाचा व्हायरस पसरवत आहेत.’ दरम्यान, यावेळी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हेदेखील पंतप्रधान मोदींसोबत या बैठकीत सहभागी झाले होते.
महत्त्वाचे म्हणजे, 2014 ला पंतप्रधान झाल्यानंतर मोदींनी पहिल्यांदाच या बैठकीत भाग घेतला आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडलेल्या नॉन अलायन मुव्हमेंटच्या (NAM) वर्च्युअल समिटमध्ये मोदी म्हणाले की, ‘जग भलेही कोरोना व्हायरचा सामना करत आहे. मात्र, काही लोक दहशतवाद, फेक न्यूज, अफवा आणि समाजाला फोडण्यासाठी व्हिडीओसारखे काही घातक व्हायरस पसरवत आहेत. भारतीय सभ्यता ही संपूर्ण जगाला एक कुटुंब मानते. आम्ही आमच्या देशांतील नागरिकांची काळजी घेत असतानाच, इतर देशांनाही मदत करत आहोत.’
समिटमध्ये बोलताना मोदींनी कोणाचंही नाव न घेता केलेल्या टिकेचा ओघ पाकिस्तानकडेच होता. काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मिरमध्ये दहशतवाद्यासोबत झालेल्या चकमकीत 5 भारतीय सैनिक शहीद झाले. एवढचं नाहीतर काश्मिर खोऱ्यात भारताबाबत पाकिस्तानकडून अनेक खोट्या बातम्या आणि अफवा पसरवण्यात येत असून सोशल मीडियाच्या आधारावर इन्फॉर्मेशन वॉरही सुरू आहे.
नॉन अलायन मुव्हमेंटच्या (NAM) वर्च्युअल समिटमध्ये बोलताना मोदी म्हणाले की, ‘एक जन आंदोलन उभे करण्यासाठी लोकशाही, शिस्त आणि निर्णायकता यांचा कशाप्रकारे संगम होऊ शकतो, हे आपण या संकटाच्या काळात पाहिले आहे. लोकांनी घरगुती आयुर्वेदिक गोष्टींचा उपयोग केला तर त्यांची रोग प्रतिकारक शक्ती वाढू शकते, असंही मोदी या समिटमध्ये बोलताना म्हणाले.