सोलापूर – सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या बाजुला अनेक धार्मिक तीर्थक्षेत्र आहेत. त्यामुळे जिल्ह्याला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवू, अशी ग्वाही पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. पर्यटन विभागाच्या वतीने केटरिंग कॉलेजच्या पदवी पदविका अभ्यासक्रमाचा शुभारंभ लोढा यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य, आमदार विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, रणजितसिंह मोहिते-पाटील उपस्थित होते.
गुरू पौर्णिमेचा मुहूर्त साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कॉलेजच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातून हॉटेल व्यवसायासाठी लागणारे चांगले मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यात पर्यटनाचा ओघ सुध्दा वाढणार आहे, असेही लोढा यांनी यावेळी सांगितले.
राज्यात पर्यटनासाठी येणाऱ्याचे आदरातिथ्य चांगले व्हावे, पर्यटनासाठी आलेल्यांनी जास्त दिवस राहावेत यासाठी प्रशिक्षणाची गरज आहे. ते प्रशिक्षण या कॉलेजच्या माध्यमातून मिळणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
सोलापूर जिल्ह्यात धार्मिक तीर्थस्थळे मोठ्या प्रमाणात आहेत. कामगारांची संख्याही अधिक आहे. याची सांगड घालून पर्यटनासाठी आलेल्यांकडून या ठिकाणी रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी. सोलापूर जिल्ह्याला धार्मिक पर्यटनाचा दर्जा मिळाल्यास रोजगारांच्या संधी आणि पर्यटनाला चालना मिळणार आहे. तसेच या केटरिंग कॉलेजला श्री स्वामी समर्थांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी सुभाष देशमुख यांनी केली.