मुंबई -भारतात येत्या ऑक्टोबर व नोव्हेंबर या कालावधीत एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धा होत आहे. त्यासाठी 10 केंद्रे निश्चित केली गेली आहेत, त्यामुळे ज्या शहरांना या स्पर्धेचे सामने मिळाले नाहीत त्यांनी बीसीसीआयच्या निर्णयावर टीकाही केली होती. आता त्यांना या स्पर्धेनंतर भारतात होत असलेल्या काही द्विपक्षीय मालिकांच्या सामन्यांच्या आयोजनाचा मान दिला जाणार असल्याचे बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी म्हटले आहे.
एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेनंतर बांगलादेश, न्यूझीलंड व इंग्लंडचे संघ भारताचा दौरा करणार आहेत. विश्वकरंडक स्पर्धेचे सामने यावेळी मोहाली, नागपूर, इंदूर, रांची, तिरुअनंतपूरम या केंद्रांना मिळालेले नाहीत त्यामुळेच त्या संघटनांनी टीका केली होती. याच केंद्रांना आता या तीन देशांविरुद्धच्या द्विपक्षीय मालिकेतील सामन्यांच्या आयोजनाचा मान दिला जाणार आहे. तसेच ज्या कालावधीत भारतात विश्वकरंडक स्पर्धा होत आहे त्यावेळी या डावललेल्या केंद्रांवर सराव सामन्यांचे आयोजन केले जाणार आहे.
आशिया करंडक स्पर्धेनंतर लगेचच ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात तीन एकदिवसीय सामने खेळण्यासाठी येणार आहे. त्याचे सराव सामनेही या केंद्रांनाच देण्यात येणार आहेत. तसेच या मालिकेनंतर अफगाणिस्तानचा संघही भारतात येण्याची शक्यता आहे. त्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात 5 टी-20 सामन्यांची मालिकाही खेळणार आहे. या मालिकेसाठीही याच केंद्रांना प्राधान्य दिले जाइल, असेही शहा यांनी म्हटले आहे.
भारत-श्रीलंका सामन्यात बदल
श्रीलंकेचा संघ एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेसाठी पात्र ठरला असल्याने त्यांचा समावेश भारताच्या गटात करण्यात आला आहे. त्यामुळे या सामन्याच्या तारखेत बदल करण्यात आला असून आता हा सामना येत्या 2 नोव्हेंबरला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे, अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे.