मुंबई : विधानसभा विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते, ते स्वराज्य रक्षक होते, असे विधान केले होते. अजित पवारांच्या या विधानानंतर भाजपसह शिंदे गटाच्या नेत्यांनी जोरदार टीका केली होती. दरम्यान हे प्रकरण आता कुठे शांत झाले होते पण भाजपकडून पुन्हा एकदा हाच विषय उकरून काढण्यात आला असल्याचे दिसत आहे.
भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी संभाजी महाराजांबद्दल अजित पवारांनी केलेल्या विधानावरून गोपीचंद पडळकरांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे. यावेळी अजित पवारांवर अप्रत्यक्ष टीका करताना त्यांची जीभ घसरली आहे. खालच्या पातळीची भाषा वापरत त्यांनी अजित पवारांवर टीका केली आहे. ते पुण्यातील एका कार्यक्रमात बोलत होते.
अजित पवारांवर टीका करताना गोपीचंद पडळकर म्हणाले, “संभाजी महाराज धर्मवीर नसते तर ‘संभाजी महाराज धर्मवीर नव्हते’ असं म्हणणाऱ्यांची कदाचित ‘सुंता झाली असती. त्यांना जर तसं वाटत असेल तर प्रसारमाध्यमांच्या मित्रांना माझी विनंती आहे की, त्यांनी तिथे जाऊन खरी परिस्थिती काय आहे? हे तपासावं.” संभाजी महाराज धर्मवीर नसते तर अशी परिस्थिती झाली असती की नसती? हे मला सांगा, असा सवालही गोपीचंद पडळकरांनी विचारला.