पुणे – करोनाची लक्षणे आढळल्यानंतर शहर आणि जिल्ह्यातील नागरिक रुग्णालयात जाण्यासाठी विलंब करत आहेत. त्रास वाढल्यानंतर रुग्णालयात येत आहेत. त्यातील काही जण उपचारांस प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे त्यांचा मृत्यू होत आहे. यासंबंधीचे निरीक्षण प्रशासनाने केले असून, जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यू हे हवेली, शिरूर, आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, दौंड आणि इंदापूर तालुक्यांत झाले आहेत, अशी माहिती समोर आली आहे
ग्रामीण भागातील करोनाग्रस्तांच्या मृत्यूचे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने विश्लेषण केले आहे. दि.18 ऑगस्ट ते 3 सप्टेंबरदरम्यान जिल्ह्यात झालेल्या करोना मृतांच्या माहितीच्या आधारे ही माहिती समोर आली आहे. यात गेल्या पंधरा दिवसांत मृत्यू झालेल्या 245 व्यक्तींची “हिस्ट्री’ तपासण्यात आली. या व्यक्तींपैकी करोनाची लक्षणे दिसल्यानंतर पहिल्या दिवशी 73 जणांनी उपचार घेतले. त्यांचे प्रमाण 29.8 टक्के आहे. 2 ते 4 दिवसांमध्ये 115 रुग्णांनी उपचार घेतले असून ते सर्वाधिक 46.93 टक्के प्रमाण आहे. तर 5 ते 6 दिवसांनी 14.28 टक्के रुग्णांनी उपचार घेतले. यामध्ये 2 ते 4 दिवस, 5 ते 6 दिवस आणि सात दिवसांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांनी उपचारास विलंब केल्याचे दिसून आले आहे.
प्लाझ्मा दानाचा अर्ज भरून घेणार
करोना रुग्णांना सरकारी, खासगी रुग्णालये किंवा कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करून घेतल्यानंतर संबंधितांकडून प्लाझ्मा दान करण्याबाबतचा अर्ज भरून घेण्यात येणार आहे. त्यामुळे आगामी काळात प्लाझ्मा उपलब्ध होण्याच्या प्रमाणात वाढ होण्याची अपेक्षा आहे. याविषयी विभागीय आयुक्त सौरभ राव म्हणाले, “शहरात 20 ब्लड बॅंक आहेत. या ब्लड बॅंकांकडून आतापर्यंत 1 हजार 600 पिशव्या प्लाझ्मा गोळा करण्यात आले असून त्यापैकी 1 हजार 350 प्लाझ्मा देण्यात आले आहे. सध्या 250 प्लाझ्मा शिल्लक आहे. मात्र, हा साठा कमी असून रक्तद्रव दान वाढण्यासाठी प्रशासनाकडून व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. त्याकरिता प्लाझ्मा दानाचा अर्ज भरून घेण्यात येत आहे.’
शहरातील यंत्रणेवर ताण वाढला
सध्या पुणे शहरात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या करोना बाधितांपैकी 30 टक्के व्यक्ती इतर जिल्ह्यांतील आहेत. परिणामी, उपचारांसाठी वैद्यकीय यंत्रणेवर ताण पडत आहे. त्याकरिता आणखी मनुष्यबळाची आवश्यकता आहे. हा ताण कमी करण्यासाठी पुणे विभागातील सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त बेड उपलब्ध करण्यात येणार आहेत. त्यामध्ये कोल्हापूर-700, सोलापुरात 600 बेड वाढवण्यात येतील. सातारा, सांगली जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये खाटांची व्यवस्था करण्यात येत आहे.