केंद्र सरकारशी संबंधित कामे मार्गी लागावी हीच इच्छा
पुणे : राज्यातील युवकांचे, उद्योगधंद्यांचे, पाण्याचा, शेती आणि शेतकऱ्यांचे असे अनेक प्रश्न केंद्र सरकारशी संबंधित आहेत. ते मार्गी लागावेत, यासाठीचे पोषक वातावरण निर्माण व्हावे, यासाठी मी भाजपसोबत गेलो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्यामागील कारण सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये अजित पवार यांना सहभागी होऊन एक महिना होत आहे. त्या पार्श्वभूमीवर विचारले असता पवार म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच यापूर्वी मी अडीच वर्ष काम केले आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मी विरोधी पक्षात काम केले. आपण ज्यांच्याबरोबरच काम करतो, त्यांच्याबरोबरच विश्वासाने काम करण्याची माझी पद्धत आहे.
आमच्यामध्ये मतमतांत्तरे असतील, वैचारिक भूमिका वेगळी असेल परंतु, आज देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे लोकप्रिय नेतृत्व आहे. नऊ वर्षात त्यांनी केलेले काम पाहिले, तर जागतिक पातळीवर भारताला जो मान मिळाला. देशात महामार्ग झाले. परदेशात ज्या प्रकारे त्यांचे प्रतिसाद मिळतो.
18-18 तास ते काम करतात. त्यांनी स्वत:ला देशाला वाहून घेतले आहे. त्यांच्या सारखी व्यक्ती आज तरी देशात कोणी नाही. जे सत्य आहे, ते सत्य आहे. मोदी आणि माझा बांध काय एकत्र आहे का? असे सांगत पवार यांनी विरोधी पक्ष आंदोलन करू शकतो, टिका करू शकतो, परंतु, निर्णय घेण्याचे अधिकार फक्त सत्ताधारी पक्षाला असतो. मला विकास करायला आवडतो. राज्याचे प्रश्न केंद्र सरकारकडून मार्गी लागावेत, यासाठी मी गेलो असल्याचे पवार यांनी सांगितले.