मुंबई – वरळी येथे आज (दि. 18) ठाकरे गटाचा मेळावा घेण्यात आला. यावेळी खासदार संजय राऊत यांनी मेळाव्याला संबोधित करत चौफेर टीका केली. यावेळी एकनाथ शिंदे यांच्यावरही घणाघाती टीका केली, त्याशिवाय मोदी-शाह यांच्याशी आमचे कोणतेही भांडण नाही, आमचे भाडंण महाराष्ट्रद्रोह्याशी आहे, असेही सांगितले. तसेच, 2024 ला सुद्धा हा देश आपल्याला ताब्यात घय्याचा आहे’. असं संजय राऊत यावेळी म्हणाले.
यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, “सीबीआय, ईडी आणि इन्कम टॅक्स हे तीन जण देश चालवत आहेत. उद्या आमचं सरकार येऊ द्या, मोदी-शाह आणि फडणवीस 24 तासांत शिवसेनेत प्रवेश करतील. त्यानंतर तुम्ही सामनामध्ये बातमी वाचाल ईडीच्या भीतीने शाह, मोदी, फडणवीस शिवसेनेत प्रवेश करणार’. असं राऊत म्हणाले.
तसेच ते पुढे म्हणाले.. “शिवसेना एकच. डुप्लिकेट माल खूप. जत्रेमध्ये खूप डुप्लिकेट माल असतो. डुप्लिकेट चंद्र, सूर्य असतो. मर्सिडीज गाडी असते. तिथं लोकं फोटो काढतात. हे बोगस बियाणे नाही. हे बाळासाहेब ठाकरे यांनी टाकलेल्या बियाण्यांचे पीक आहे’. असं म्हणत राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदेंना देखील टोला लगावला.
‘भाजपचे लोक मुंबईवर कब्जा करु असं म्हणत आहेत. मुंबई आणि शिवसेना लेचीपेची नाही. कुणीही यावं आणि कब्जा करावा. तुमच्यात हिंमत असेल तर मुंबई महानगर पालिकेची आणि इतर महानगर पालिकांच्या निवडणुका लावा, मग दाखवू’. असा इशारा संजय राऊतांनी यावेळी दिला आहे.