श्रीगोंदा -श्रीगोंद्याच्या सिंचनासाठी हक्काचे सव्वा ते दीड टीएमसी पाणी मिळायला हवे. आत्तापर्यंत पाऊण टीएमसी पाणी मिळाले आहे. चुकीच्या नियोजनामुळे श्रीगोंद्यातील शेतकऱ्यांच्या हक्कावर गदा येऊन हक्काचे पाणी मिळत नसेल, तर आपण विधानसभेत जलसंपदा विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हक्कभंग प्रस्ताव आणूच. शिवाय लॉकडाऊन संपल्यावर आमची आंदोलनाची ताकत दाखवून देऊ, असा सणसणीत इशारा आमदार बबनराव पाचपुते यांनी दिला.
पाचपुते म्हणाले, सद्यस्थितीत पाणी मिळवून देण्याचा माझा प्रयत्न सुरू आहे. अधिकऱ्यांच्या हातून अजूनही वेळ गेलेली नाही. त्यामुळे अजूनही त्यांनी गांभीर्याने घेऊन श्रीगोंद्याला पाणी मिळवून द्यावे. लॉकडाऊनमुळे आम्हाला बाहेर पडता येत नाही. आम्हाला ज्या मर्यादा आहेत, त्याचा कुणीही गैरफायदा घेऊ नये, असे सांगत आ. पाचपुते म्हणाले, श्रीगोंद्याचे सिंचन पूर्ण होण्यासाठी अजून हक्काचे अर्धा टीएमसी पाणी द्या.
कालवा सल्लागार समितीची बैठक करोनाच्या पार्श्वभूमीवर झाली नाही. मात्र अधिकाऱ्यांनी ठरविले असते, तर व्हिडिओ कॉन्फरन्सवर ती घेता आली असती. अधिकाऱ्यांनी आपल्याला शब्द दिला होता की श्रीगोंद्याला हक्काचे पाणी देऊ. पण पाणी कमी येतेय, असे लक्षात आल्यावर आपण जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याशी संपर्क केला असता, त्यावेळी मंत्रिमहोदयांनी संबंधित अधिकऱ्यांना तातडीने पुढील कार्यवाही करण्याचे आदेश दिलेले होते. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य तो पाठपुरावा केल्याचे दिसून येत नसल्यामुळे श्रीगोंदा तालुका पाण्यापासून वंचित राहात आहे.
कुकडी व घोड कार्यक्षेत्रात मी एकमेव विरोधी पक्षाचा आमदार असल्याने याचा सत्ताधारी गैरफायदा घेत असल्याची शंका येत आहे. उद्या वेळ आली तर या पाणी प्रश्नाबाबत विधानसभेत ही याबाबत आवाज उठवू. लॉकडाऊन नसते, तर श्रीगोंदेकरांवर ही वेळ आलीही नसती, असेही ते म्हणाले.