पुणे – परदेशांतून प्रवास करून आलेल्या किंवा अन्य राज्यातून प्रवास करून आलेल्यांनाच करोना होतो, अशी स्थिती आता राहिली नाही. याची लागण थेट सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळेच महापालिकेने आता पॉझिटिव्ह रुग्णांच्या आजूबाजूच्या नागरिकांच्या विलगीकरणाची व्यवस्था विविध शाळांमध्ये केली आहे. महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी या संदर्भात आदेश दिले आहेत.
शहरातील झोपडपट्ट्या आणि दाट लोकवस्तीमध्ये दिवसेंदिवस करोनाचा संसर्ग वाढतच आहे. ही साखळी तोडण्यासाठी ज्या दाटवस्तीत आणि झोपडपट्टीमध्ये करोनाचे पॉझेटिव्ह किंवा संशयित आढळतात, तेथील नागरिकांची शाळांमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
शहरात करोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. विशेषत: भवानी पेठ, बिबवेवाडी, कसबा-विश्रामबागवाडा, ढोले पाटील रस्ता, येरवडा कळस धानोरी, पाटील इस्टेट, कासेवाडी, पर्वतीदर्शन, गुलटेकडी, लक्ष्मीनगर, लोहियांनगर अशा भागात मोठ्या प्रमाणात बाधितांची संख्या वाढत आहे.
झोपडपट्टी आणि दाट लोकसंख्या असलेल्या परिसरातील संशयित व्यक्तींना विलगीकरण करणे, पुढील उपचार करणे, या दृष्टीने तसेच रुगणामुळे घरातील इतरांना बाधा होऊ नये, यासाठी जलद आणि प्रभावी उपचार करणे अवघड होते.
या पार्श्वभूमीवर दाट वस्तीच्या परिसरातील नागरिकांना उपाय योजनेंतर्गत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याच्या दृष्टीने किमान रात्री आणि दिवसा गरजेनुसार महापालिकेच्या विविध शाळांमध्ये तात्पुरता निवारा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे पालिका आयुक्त गायकवाड यांनी सांगितले.
शाळांमध्ये राहण्यास येणाऱ्या व्यक्तींनी स्वतःचे जेवण, बिछाना, वापरावयाच्या मूलभूत वस्तू यांची सोय स्वतः करावयाची आहे. येथे महापालिकेकडून केवळ राहणे आणि झोपण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. सोबतच सुरक्षा, स्वच्छतागृह, साफसफाई, निर्जंतुकीकरण, पिण्याचे पाणी, विद्युतव्यवस्था पालिका
करणार आहे.
– शेखर गायकवाड, आयुक्त, मनपा