आठव्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन
पुणे – औषधे, औषधी वनस्पती आणि औषधपद्धती क्षेत्रांतील प्रगती आणि प्रसारण करूनच आपला आत्मविश्वास वाढेल आणि भारत देश आरोग्यक्षेत्रात खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर होईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले. तसेच त्यांनी “हर्बल-डिजिटल-स्पिरिच्युअल’ हा आरोग्याचा मोलाचा सत्यम-शिवम-सुंदरम मंत्र दिला.
भारती विद्यापीठ अभियमत विश्वविद्यालयाच्या पूना कॉलेज ऑफ फार्मसी आणि पुण्यातील सर्व फार्मसी कॉलेजेस यांच्या संयुक्त विद्यमाने “एथनोफार्माकॉलॉजी व औषधी वनस्पती : उत्पादन विकासाच्या दिशेने’ या विषयावर आठव्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन डॉ. माशेलकर यांच्या हस्ते झाले.
यावेळी यूजीसीचे माजी उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन, विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे आणि प्र-कुलगुरू डॉ. विश्वजित कदम उपस्थित होते. डॉ. शिवाजीराव कदम यांना त्यांच्या शैक्षणिक आणि औषधनिर्माण क्षेत्रांमधील संशोधन कार्याबद्दल “जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित केले.
डॉ. भूषण पटवर्धन यांनी भारतीय संशोधकांनी पारंपरिक औषधांचे संशोधन, माहिती संकलन व जतन करणे गरजेचे असल्याचे नमूद केले. डॉ. शिवाजीराव कदम यांनी शिक्षक आणि युवा संशोधकांना गुणवत्तापूर्वक व सामाजिक संशोधनाची महत्त्व अधोरेखित केले.
डॉ. विश्वजीत कदम यांनी आयुर्वेदाचे व औषधी वनस्पतींच्या संशोधनावर भर देण्याच्या हेतूने भारती विद्यापीठातर्फे परिषद आयोजिण्यात आल्याचे सांगितले. याप्रसंगी “सोसायटी फॉर एथनोफार्माकॉलॉजी’चे डॉ. सी. के. कटियार, डॉ. इंद्रनील दास, डॉ. पुलोक मुखर्जी, डॉ. के. आर. महाडिक, डॉ. एल. सत्यनारायणन व पूना कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. आत्माराम पवार उपस्थित होते.