मुंबई : राज्यात शुक्रवारी कोरोनाच्या तब्बल 1576 नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 29,100 असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, आज राज्यात 49 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी 34 जण मुंबई, तर पुण्यातील 6, अकोला शहरात 2, कल्याण, डोंबिवलीमध्ये प्रत्येकी 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 1060 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज 505 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आतापर्यंत 6564 कोरोना बाधित रूग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.
राज्यात आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 2 लाख 50 हजार 436 नमुन्यांपैकी 2 लाख 21 हजार 336 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले आहेत; तर 29,100 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 3 लाख 29 हजार 302 व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून 16 हजार 306 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 1473 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून एकूण 14,167 सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी 58.97 लाख लोकांचे सर्वेक्षण केले आहे.