पुणे,(सागर येवले) –सर्वसाधारणपणे मे ते ऑगस्ट कालावधीत आपल्याकडे सर्पदंशाच्या घटना अधिक घडतात. त्यामध्ये शेतकरी, मजुर, यासह पर्यटनासाठी गड-किल्ले, धरण, तलाव किंवा डोंगरमाथ्यावर टेन्ट टाकून राहणे, ट्रेकिंग करणारे यांना सर्पदंशाचा धोका अधिक असतो. भारतामध्ये जगाच्या तुलनेत दरवर्षी जवळपास 27 लाख लोकांना सर्पदंश होतो, आणि 50 हजार लोकांचा मृत्यू होतो. जगामध्ये दरवर्षी 4 लाखापेक्षा जास्त लोकांना सर्पदंशामुळे कायमचे शारीरिक व मानसिक अपंगत्व येते, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
“साप’ हा शेतकऱ्याचा मित्र आहे, असे म्हटले जाते. मात्र, स्वत:चा बचाव करण्यासाठी सर्प दंश करतो. शेतामध्ये किंवा घराच्या परिसरात अडगळीच्या ठिकाणी साप दिसून येतात. ज्यावेळी व्यक्ती त्या अडगळीमध्ये जातो, त्यावेळी व्यक्ती आपल्याला मारेल या भीतीने साप दंश करतो. सर्पदंश हा उष्णकटीबंध येथे अधिक घटना घडत असल्याचे दिसून येते. जगामध्ये प्रत्येक दिवशी सरासरी 7 हजार 400 लोकांना सर्पदंश होतो, तर 220 ते 280 रुग्णांचा एका दिवसात मृत्यू होतो.
साप चावल्यावर प्रथमोपचार काय करावे
*रुग्णास मोकळ्या जागेत घेणे,
*त्याला धीर देऊन कोणतीही हालचाल करु देऊ नका.
*आवळपट्टी: मण्यार दंशात विशेष फायदा होतो.
*हाताला दंश असल्यास दंडाला व पायाला दंश असल्यास मांडीला आवळपट्टी बांधावी.
*यासाठी दोरी, दस्ती, रबर, बॅंडेज-क्रेप बॅंडेज, वेलीची फांदी, जास्त घट्ट न बांधता एक बोट जागा राहिल एवढे बांधावे.
*रुग्णाला त्वरीत जवळच्या रुग्णालयात दाखल करावे.
*आरोग्य यंत्रणेस फोनद्वारे रुग्णासंबंधी पूर्वसुचना देऊन सतर्क करावे.
ही काळजी घ्या
*ट्रेकिंग किंवा राहण्याच्या ठिकाणी टेंन्ट लावताना साप आत येणार नाही, याची खबरदारी घ्यावी.
*पर्यटनाला जाताना बुट घालावे.
*खाच-खपारीमध्ये हात घालू नये.
*गवत किंवा झाडी वाढलेल्या ठिकाणी खबरदारी घ्यावी.
*रात्रीच्या वेळी फिरताना बॅटरी व काठीचा वापर करावा. झोपण्यासाठी शक्यतो टेंन्ट, मछरदाणीचा वापर करावा. मृतावस्थेत साप *दिसल्यास काळजीपूर्वक हाताळा. कारण बऱ्याचदा तो अर्धमेला असतो आणि तो दंश करू शकतो.
साप चावल्यावर हे करू नये
*रुग्णाला लिंबाचा पाला, मिरच्या खाऊ घालू नये.
*कोणतेही गावठी औषध देऊ नका
*दंशाच्या जागी छेद घेऊ नये. तो भाग कापू नये.
*मांत्रिक अथवा भोंदूबाबाकडे नेऊ नका.
*रुग्ण अर्धवट शुद्धीवर असल्यास पाणी किंवा अन्न देऊ नये
*आवळपट्ट्या घट्ट बांधू नयेत. अधिकचा त्रास होतो.
*दंशाच्या जागेतून तोंडाने विष काढू नये.
सर्पदंशाचे बहुतांश रुग्ण गरीब, तरुण शेतमजूर, महिला व मुले असतात. सर्पदंशावरील उपचारासाठी होणारा खर्च गरीब रुग्णांच्या व त्याच्या कुटुंबाच्या आवाक्याबाहेर असतो. बहुतांशवेळा त्यांचा वैद्यकीय विमा उतरवलेला नसतो आणि शासकीय आरोग्य विषयक योजनांचा लाभ त्यांना मिळत नाही. त्यामुळे वेळेत उपचार न मिळाल्यामुळे सर्प दंशामुळे मृत्युचे प्रमाण वाढण्याची भीती अधिक असते. त्यामुळे सर्प दंश झाल्यानंतर त्या रुग्णाला तत्काळ उपचार मिळणे आवश्यक आहे.
– डॉ. सदानंद राऊत, सर्पदंश उपचारतज्ज्ञ