आरोग्य विभागाच्या प्रयत्नांना यश; चालू वर्षात फक्त 2 नवे रुग्ण
जागतिक हिवताप दिनविशेष..
मुकुंद भालेराव
नगर – नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये हिवताप हा घातक आजार आता नियंत्रणात आला आहे. हा आजार नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य विभागाने केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. सन 2015 ते 2018 या चार वर्षांच्या काळात विभागात जवळपास 2 हजार 377 रुग्ण आढळले होते. त्यानंतर मात्र रुग्णसंख्या सातत्याने कमी होत गेली. आता तर चालू वर्षात या जिल्ह्यांत आतापर्यंत फक्त 2 रुग्ण आढळले आहेत.
उन्हाळ्यातील जास्त तापमानात डास कमी असले तरी पावसाळ्यात मात्र डासांची संख्या वाढते. त्यामुळे या काळात रोगराईचे प्रमाणही वाढत असते. डासांमुळे अनेक आजारांचा फैलाव होतो. डेंगी, मलेरिया (हिवताप), चिकुनगुण्या या आजारांचे प्रमाण राज्यात जास्त आहे. या आजारांना रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून उपाययोजना केल्या जातात. या उपाययोजनांमुळे आजार काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसते. राज्यात सध्या हिवताप निर्मूलनावर भर देण्यात आला आहे.
जागतिक हिवताप दिनानिमित्त एप्रिल महिन्यात विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहे. या आजाराबाबत होणारी जनजागृती आणि आरोग्य विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांमुळे आजाराचे प्रमाण कमी झाल्याचा दावा केला आहे. नाशिक जिल्ह्यात 2015 मध्ये हिवतापाचे 231 रुग्ण आढळले. त्यानंतर 2016 मध्ये 109, 2017 मध्ये 40 आणि 2018 मध्ये 9 रुग्ण आढळून आले. धुळे जिल्ह्यात 2015 मध्ये 232, 2016 मध्ये 127, 2017 मध्ये 80 आणि 2018 मध्ये 17 रुग्ण आढळले.
नंदूरबार जिल्ह्यात 2015 या वर्षात 634, 2016 मध्ये 295, 2017 मध्ये 147 आणि 2018 मध्ये 51 रुग्ण आढळले. जळगाव जिल्ह्यात 2015 मध्ये 200, 2016 मध्ये 64, 2017 मध्ये 32 तर 2018 मध्ये 6 रुग्ण आढळले. नगर जिल्ह्यात 2015 मध्ये 55, 2016 मध्ये 24, 2017 मध्ये 13, आणि 2018 मध्ये 11 रुग्ण आढळले. मागील वर्षात नंदूरबार 4, नाशिक 3, धुळे 2, जळगाव आणि नगरमध्ये प्रत्येकी 1 रुग्ण आढळला होता.
आरोग्य विभाग डासांपासून उद्भवणाऱ्या आजारांना रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे. मागील सहा वर्षात नाशिक विभागात हिवताप रुग्णांची संख्या कमी झाली आहे. या काळात आजाराचा फैलाव होऊ नये, यासाठी नागरिकांनीही आवश्यक काळजी घेणे गरजेचे आहे.
– डॉ. पी. डी. गांडाळ, सहायक संचालक (हिवताप), नाशिक विभाग