सासरी जाताना आईपेक्षा बाबांच्या गळ्यात पडून रडणाऱ्या मुली जास्त दिसतात. परदेशी गेल्यावर बाबांशी मोबाइलवरून न चुकता संवाद साधणाऱ्या मुलांच्या संख्येत भर पडतेय. कारकिर्दीच्या किंवा जीवनातल्या लग्नासारख्या महत्त्वाच्या निर्णयात आई इतकेच आजकाल बाबा मुलांना जवळचे वाटतात. नव्या पिढीतल्या बाबांचं मुलांशी जरा हटके नातं तयार होतंय. ते कसं आहे? “फादर्स डे’ च्या निमित्ताने “पप्पां’च्या अंतरंगात डोकावण्याचा एक प्रयत्न…
“पप्पा, हा माझा मित्र सौरभ, एम.बी.ए. झालाय. माझ्याच कंपनीत कामाला आहे. आम्ही लग्नाचा विचार करतोय, पण त्या”आधी मला तुझं काय मत आहे ते जाणून घ्यायचंय.’ मैत्रीने रवीच्या पुढ्यात एक फोटो ठेवत सुरुवात केली. “तू त्याला एकदा भेटशील का? म्हणजे तुझी परवानगी असेल तर मी आईलाही सगळं सांगणार आहे. तसं तिच्याशी बोलायला हरकत नाही पण यू नो, तिचं ते पत्रिका वगैरे प्रकरण सुरू होतं. त्यात मला इंटरेस्ट नाही. तुला मुलगा आवडला तर तू आईला समजाव ना प्लीज’ मैत्री लाडाने जवळजवळ पप्पांच्या गळ्यात पडत म्हणाली.
हे आजच्या पिढीतल्या मुलं आणि बाबांच्या नात्याचं एक प्रातिनिधीक चित्र आहे. काल-परवापर्यंत चित्र अगदी उलट असायचं. मुलं आधी आईला विश्वासात घ्यायची; पण आता त्यांना तिच्या मध्यस्थीची गरज पडत नाही. उलट आईला हो म्हणायला लावायला बाबा हे नवं शस्त्र त्यांच्याजवळ आहे. जमाना किती वेगाने बदलला आहे!
माया-ममता, लाडकोड, काळजी या सगळ्याचं पेटंट जणू काही आईने घेतलेलं असतं. बाबा असतात ते कधीतरी बाहेर फिरायला न्यायला, पाहिजे ते घेऊन देण्याचा हट्ट करायला आणि काही चुकलं तर भीती घालायला… हे बाबांचं पारंपरिक चित्र रंगवलं गेलं आहे, पण आजच्या पिढीतला बाबा हळूहळू बदलतोय. मल्टिनॅशनल किंवा प्रायव्हेट कंपन्यात जाऊ लागल्यापासून बाबा एका वेगळ्यात भूमिकेत शिरलाय. गेल्या 10 वर्षातलं बाबा या व्यक्तीचं चित्र मुलांच्या मनात झपाट्याने बदलतंय. खरं तर आधीच्या पिढीपेक्षा जास्त धावपळ, जास्त स्पर्धा आणि जास्त वेळ कुटुंबापासून लांब राहण्याची वेळ आजकालच्या बाबांवर येत असली तरी मुलांशी त्याचे भावनिक सूर छान जुळलेत. मुलांनाही “ए आई’ सारखं “ए बाबा’ म्हणून त्याच्याशी जवळीक साधायची संधी मिळतेय.
बाबा या व्यक्तीचं पारंपरिक चित्र बदलतंय एवढं खरं. त्याला कारणं काही असतील; पण आई आणि बाबा आता दोघंही मुलांना जवळचे वाटताहेत हे महत्त्वाचं. आजकाल मुलांच्या लहानपणापासूनच बाबा लोकांना त्यांच्या नात्यातल्या जबाबदाऱ्यांप्रमाणे त्यातल्या भावनिक ओलाव्याचं महत्त्व कळायला लागतं. त्याची सुरुवात मुलाच्या अगदी जन्मापासून किंवा त्याच्याही आधी गर्भसंस्कारापासून होते म्हणा ना. आजकाल गर्भसंस्कारात आई आणि वडील दोघांचं होणाऱ्या मुलाशी एक भावनिक नातं निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे जन्मल्यापासून त्यांना बाबांच्या प्रेमाचा अनुभव घेता येतो.
आजकाल आई-वडील दोघं नोकरी करणारे आणि त्यातही विभक्त कुटुंबात राहणारे असल्याने पहिल्यापासून मुलांची अनेक प्रकारची जबाबदारी बाबा लोकांवर पडते. मग कधी त्याला पाळणाघरात किंवा शाळेत सोडायला जाणं असो की कधी त्याच्या आजारपणात सुट्टी काढून घरी थांबणं असो. आजकालचे बाबा ही कामं विनातक्रार करू लागले आहेत. परदेशात तर प्रत्यक्ष डिलिव्हरीच्या वेळी बाबाला उपस्थित राहण्याची सुविधा मिळते. तसेच मुलाच्या जन्मानंतर सक्तीची रजा देऊन बाबांना घरी मुलाबरोबर बसवलं जातं. आपल्याकडे तो ट्रेंड अजून नाही, पण दोन-चार दिवसांच्या पॅरेंटल लिव्हची मजा अनेक बाबा घेताना दिसतात.
मुलांच्या शाळेतल्या मिटिंग्जना जाणं किंवा त्यांच्या प्रोजेक्टमध्ये भाग घेणं असं काही करायला आजकालचे बाबा उत्सुक असतात. ही बदलती परिस्थिती त्यांना मुलांच्या भावविश्वात कळत नकळत प्रवेश देते. मग बाबांशिवाय पान हालत नाही, असंही चित्र दिसतं.
सावनीला दिवसभर बाबा दिसत नाहीत; पण रात्री कितीही उशीर झाला तरी ती बाबांशिवाय जेवत नाही. शनिवार, रविवार बाबांना ऑफिसमध्ये जावं लागलं की छोटा आयुष बाबांच्या सरांना खोटा खोटा फोन करून रागावतो. आईजवळ ज्या आंतरिक मायेने मुलं जातात ती जागा आता बाबांनाही मिळायला लागली आहे. आजच्या पिढीतल्या बाबांचं हे पुढचं पाऊल म्हणायचं का? मागच्या पिढीपर्यंत म्हणजे आजचा बाबा मूल असेपर्यंत बाबांशी बोलण्याची किंवा त्यांच्याशी एखाद्या न पटलेल्या विषयावर वाद घालण्याची वेळ फारशी यायची नाही. बाबाही मुलाला आपली चप्पल येऊ लागल्यावर त्याच्याशी मैत्रीच्या नात्याने वागायचा प्रयत्न करायचे, पण बऱ्याचदा आधीचा शिस्तीचं आणि रागवण्याचं काम घेतलेल्या बाबांना हा बदल जमायचा नाही. त्यामुळे बाबांच्या मनात कितीही प्रेमभावना असली तरी ती दाखवता यायची नाही.
पण आजच्या पिढीला त्याची पुनरावृत्ती होऊ द्यायची नाही. त्यांना पहिल्यापासूनच मुलांमध्ये आणि त्यांच्या नात्यात एक पारदर्शीपणा जपायचा आहे. मागच्या पिढीतल्या लोकांना अजून ते पटत नाही. मुलांनी बाबांना “ए बाबा’ अशी एकार्थी हाक मारणं म्हणजे त्यांना मान न देणं असं त्यांना वाटतं, पण आजच्या पिढीतला बाबा झालेला वैभव म्हणतो, “आम्हालाही मुलांच्या तोंडून अशी हाक ऐकल्यावर त्यात आपलेपणा वाटतो. मनात भीतीयुक्त आदरापेक्षा प्रेम असणं अधिक महत्त्वाचं नाही का?’ हा आजच्या पिढीतल्या बाबांचा प्रातिनिधिक प्रश्न आहे. मुलांना पाहिजे त्या गोष्टी लगेच घेऊन देणं म्हणजे त्यांचे नको ते लाड करणं अशीही मागच्या पिढीची समजूत आहे. मात्र आनंद म्हणतो की, “काळाच्या चौकटीत विचार केला तर काल ज्या गोष्टी प्रयासाने शक्य व्हायच्या त्या आज सहज शक्य आहेत. त्यासाठी मुलांच्या छोट्या अपेक्षा का अपूर्ण ठेवायच्या? आम्हाला मिळालं नाही म्हणून मुलांना देतो अशातला भाग नसून शक्य आहे म्हणून मुलांचे हट्ट पुरवतो या दृष्टिकोनातून त्याकडे बघा ना.’ या पिढीतल्या बाबाची ऐपत वाढली आहे हे खरंय, पण त्यांच्या मुलांपुढे असलेली आव्हानंही तितकीच पुढे गेली आहेत याचा कुठेतरी विचार करायला हवा. ती पूर्ण करताना आजचा बाबा आपल्या परीने झटतोय इतकंच. त्याचा मार्ग बदलला आहे आणि तो मुलांच्या भावविश्वाच्या अधिक जवळ जाणारा आहे. मूलं आणि बाबा यांच्या नात्याला आई-मुलाच्या नात्यासारखी आंतरिक प्रेमाची किनार लाभत असेल तर बाबांच्या बदलत्या भूमिकेचं कौतुकच करायला हवं नाही का?
– स्वाती वाळिंबे