- निम्मे स्फोट प्राणांतिक : महावितरणच्या बेजबाबदारपणाबद्दल नागरिकांमधून तीव्र संताप
पिंपरी – गेली चार वर्षांत उद्योगनगरीत विद्युत रोहित्रांचे एकूण सहा स्फोट झाले असून, त्यापैकी निम्मे म्हणजे तीन अपघात प्राणांतिक आहेत. या तीन अपघातांमध्ये एकूण पाच व्यक्तींना जीव गमवावा लागला आहे. महावितरणच्या अशा बेजबाबदारपणाच्या कारभाराबद्दल नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. वारंवार लहान-मोठे स्फोट होत असतानाही महावितरणकडून आवश्यक सर्तकता बाळगली जात नाही.
महावितरण कंपनी विद्युत रोहित्रांबाबत योग्य खबरदारी घेत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर चिंचवड येथे 2016 मध्ये रोहित्राचा स्फोट झाला. त्यामध्ये एका चर्मकार बांधवाचा होरपळुन मृत्यू झाला. ही घटना शेकडो नागरिकांसमोर घडली. या घटनेनंतर या चर्मकाराचा विदारकपणे पडलेल्या मृतदेहाचे दृश्य हेलावणारे होते. या घटनेनंतर महावितरणच्या कारभारावर मोठी टिका होऊ लागली. त्यानंतर रोहित्रांना सुरक्षित आवरण घालण्याची निविदा काढण्यात आली. त्यानंतर लाखो रुपये खर्चून शहरातील ठराविक ठिकाणच्या रोहित्रांना हे सुरक्षित आवरण बसविण्यात आले.
या घटनेनंतर नेवाळेवस्ती येथे अशाप्रकारचा आणखी एका रोहित्राचा स्फोट झाला. यामध्ये एका पादचारी महिलेचा मृत्यू झाला. याशिवाय आता दोन दिवसांपूर्वीच इंद्रायणीनगरमध्ये झालेल्या रोहित्राच्या स्फोटात एका चिमुकलीसह दोन महिलांचा मृत्यू झाला. आतापर्यंत शहरात झालेल्या अशा घटनांमध्ये परवा घडलेल्या इंद्रायणी नगरमधील घडलेल्या अपघातात सर्वाधिक मनुष्यहानी झाली आहे.
तर याच कालावधीत उद्योगनगरीत रोहित्रांचे स्फोट होण्याच्या तीन घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये सुदैवाने कोणतीही प्राणहानी झाली नाही. चिंचवडेनगरमधील रस्त्यावर असलेल्या रोहित्राचा रात्री स्फोट झाला. या घटनेत रोहित्रामधील उकळते ऑइल रस्त्यावर सांडले होते. मात्र, रात्रीची वेळ असल्याने कोणतीही व्यक्ती यामध्ये जखमी झाली नाही. तर इंद्रायणीनगरमध्ये यापूर्वी झालेल्या रोहित्राच्या स्फोटात एक मोहला किरकोळ जखमी झाली होती. तर स्पाईन रस्त्यावरील भाजी मंडई चौक ते शरदनगर सेवा रस्त्यावर 14 एप्रिल 2019 रोजी दुपारी दोनच्या सुमारास रोहित्र फुटून मोठ्या प्रमाणावर ऑइलगळती झाली. हे रोहित्र पदपथावर होते. तसेच जवळच असलेल्या धार्मिकस्थळी रामनवमीनिमित्त सप्ताह सुरु होता. मात्र, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
विद्यतु रोहित्रांच्या अपघातात मृत्यू झालेल्या नागरिकांच्या नातेवाइकांना मिळणारी नुकसान भरपाईची रक्कम तुटपुंजी आहे. मात्र, महावितरणच्या निष्काळजीपणामुळे विद्युत शॉक बसून मृत्यु झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना तर अगदीत तुटपुंजी नुकसान भरपाई दिली जाते. मनुष्यहानी अथवा वित्तहानी झालेल्या अपघातांची विद्युत निरिक्षकांमार्फत झालेल्या चौकशीचा अहवाल, दोषी अधिकाऱ्यांवर झालेली कारवाई अथवा त्यांना झालेली शिक्षा या बाबी आजही समोर आलेल्या नाहीत. त्यामुळे महावितरणने या लपवाछपवीच्या धोरणाचा फेरविचार करण्याची वेळ आली आहे.
– नंदकुमार जगदाळे, अध्यक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष