पुणे – महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या सर्व प्रकारच्या वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षांसाठी (एमसीक्यू) आता नकारात्मक गुणांसाठी (निगेटिव्ह मार्किंग) एकच सूत्र लागू होणार आहे. एका चुकीच्या उत्तरासाठी पंचवीस टक्के किंवा 1/4 गुण मिळालेल्या एकूण गुणांमधून कमी केले जाणार असल्याचा निर्णय ‘एमपीएससी’ने घेतला आहे. त्यामुळे आता निगेटिव्ह गुणात सुसूत्रता राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
‘एमपीएससी’तर्फे वस्तुनिष्ठ पद्धतीच्या परीक्षांना निगेटिव्ह मार्किंग नव्हती. त्यामुळे योग्य उत्तर माहिती नसले, तरी उमेदवार एका पर्यायाला गोल करून टाकायचे. यात सुधारणा करत ‘एमपीएससी’ने 2009 पासून निगेटिव्ह मार्किंग सुरू केले. त्यामध्ये चार चुकीच्या उत्तराला एक गुण वजा करण्यात येत होता. राज्यसेवा परीक्षेला तीन चुकीच्या गुणांना एक गुण कमी होत असे. या दरम्यानच्या काळात थोडेफार बदल करण्यात आले होते. आता नवीन पद्धतीने गुण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे जाहीर होणाऱ्या या परीक्षेच्या तारखांना ही पद्धत अवलंबवली जाणार असल्याचे ‘एमपीएससी’ने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
प्रत्येक चुकीच्या उत्तराकरीता 25 टक्के किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून कमी केले जातील. एखाद्या प्रश्नाचे एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास असे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्याच्या उत्तरासाठी 25 टक्के इतके गुण एकूण गुणांमधून कमी करण्यात येणार आहे. या कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली, तरीही ती अपूर्णांकातच राहील व पुढील कार्यवाही त्याच्या आधारे करण्यात येईल. एखाद्या प्रश्न अनुत्तरित असेल तर, अशा प्रकरणी नकारात्मक गुणांची पद्धत लागू असणार नाही.
आयोगामार्फत यापुढे जाहीर होणाऱ्या स्पर्धा परीक्षा, मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षांच्या निकालाकरीता हा नियम लागू राहील. आयोगाच्या संकेतस्थळावरील संबंधित परीक्षांच्या परीक्षा योजनांमध्ये यथावकाश सुधारणा करण्यात येतील. तोपर्यंत उपरोक्त कार्यपद्धतीनुसार कार्यवाही करण्यात येईल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.