पुणे – एल्गार परिषद प्रकरण तसेच भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) पुण्यातून कबीर कला मंचची कार्यकर्ती ज्योती जगताप हिला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात सोमवारी रात्री रमेश गायचोर आणि सागर गोरखे यांना अटक करण्यात आली होती.
माओवादी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयावरुन सागर तात्याराम गोरखे (रा. वाकड), रमेश मुरलीधर गायचोर (रा. येरवडा), ज्योती राघोबा जगताप (रा. कोंढवा) यांना अटक करण्यात आली आहे. तिघांचा भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणात सहभाग असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
तिघांना मुंबईतील एनआयएच्या पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेत अटक केली. त्यानंतर त्यांना मंगळवारी मुंबईतील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना चार दिवस एनआयए कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. बंदी घातलेल्या माओवादी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयावरुन ही कारवाई करण्यात आली.
तिघां विरोधात बेकायदेशीर हालचाली प्रतिबंधक कायदा (यूएपीए), कट रचणे तसेच अन्य कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे. एल्गार परिषद प्रकरणात पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात पुणे पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले होते. एल्गार प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपविण्यात आला आहे.
गोरखे, गायचोर, जगताप यांच्या विरोधातही पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. एनआयएने या प्रकरणात आनंद तेलतुंबडे, गौतम नवलाखा, प्रा. हनी बाबू यांना अटक केली होती. तपासात गायचोर, गोरखे, जगताप बंदी घातलेल्या माओवादी संघटनेशी संबंधित असून ते पुण्यातील कबीर कला मंचचे कार्यकर्ते असल्याचे एनआयएतील अधिकाऱ्यांनी सांगितले.