मुंबई – पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची भीमा कोरेगाव चौकशी आयोगासमोर तब्बल सहा तास साक्ष नोंदवण्यात आली. शुक्ला यांनी पुराव्यांचे प्रतिज्ञापत्रही सादर केले. दरम्यान भीमा कोरेगाव दंगल उसळली त्यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक असणाऱ्या विश्वास नांगरे पाटील यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे.
या चौकशीनंतर रश्मी शुक्ला यांनी पत्रकारांना कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. सरकारी वकील शिशिर हिरे यांनी सांगितले की, रश्मी शुक्ला यांनी चौकशीला पूर्ण सहकार्य केले.
कोरेगाव भीमा चौकशी आयोगाचे वकील ऍड. आशिष सातपुते यांनी नांगरे पाटलांना चौकशी कामी साक्ष नोंदवण्यासाठी आयोगासमोर बोलवण्यासाठी आयोगासमोर अर्ज दाखल केला. ही मागणी ग्राह्य धरून मुंबईचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना चौकशीसाठी बोलविले जाणार आहे.
हिरे म्हणाले, 1 जानेवारी 2018 ला जेव्हा भिमा-कोरेगावची घटना घडली तेव्ही विश्वास नांगरे पाटील कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरिक्षक म्हणून ते काम करत होते. त्यामुळे त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात यावे असा मागणी अर्ज आयोगाचे वकील आशिष सातपुते यांनी केला. त्यावर आयोगाने आदेश केला आहे. तसेच विश्वास नांगरे पाटील यांचं पुराव्याचे प्रतिज्ञापत्र देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शुक्ला यांचे प्रतिज्ञापत्र सुस्पष्ट
सर्व वरिष्ठ अधिकारी कायद्याने बांधलेले आहेत. ते अत्यंत जबाबदारीने काम करतात. रश्मी शुक्ला यांचं पुराव्याचे प्रतिज्ञापत्र अतिशय सुस्पष्ट आहे. 1 जानेवारीच्या घटनेनंतर पुण्यात कोणतीही घटना घडली नाही. कोणताही कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नव्हता. या संदर्भात रश्मी शुक्ला यांनी साक्ष दिली आहे. पुढील कामकाज मुंबई येथे 21-25 फेब्रुवारी दरम्यान सुरू होईल.