सातारा – करोना संक्रमणाची वाढती दहशत व वारंवार वाढत जाणारा बळीचा आकडा यावर नियंत्रण आणण्यात प्रशासनाची रणनीती यशस्वी होताना दिसत नाही. जिल्हा प्रशासनाने ठोस उपाययोजना राबवून त्याची कडक अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी सोमवारी दि. 28 रोजी सर्वपक्षीय व सामाजिक संघटनांच्यावतीने सुरक्षित अंतर पाळून मूक मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती नगरसेवक अमोल मोहिते यांच्या स्वाक्षरीने प्रसारीत करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
पत्रकात म्हटले आहे की, जिल्ह्यातील बाधितांची संख्या जवळपास 33 हजारांच्या पुढे गेली आहे. मृत्यूचा आकडा आता हजार झाला आहे. जगभर बाधितांची संख्या वाढत असाताना सातारा जिल्ह्यातही वाढणार, हे लक्षात घेऊन काम सुरू केले असते तर साताऱ्यावर ही वेळ आली नसती. आज साताऱ्यातील अवस्थेची कल्पनाच करवत नाही. सामान्य सातारकर, सातारा नगरपालिकेतील जबाबदार लोकसेवक आणि एक करोनाबाधित म्हणून अनेक समस्या आल्या. आजही तेच प्रश्न कायम आहेत.
साताऱ्यात बाधितांची संख्या वाढत असताना जिल्हा प्रशासन नेमके काय करत होते, त्याचा उलगडा आजही होत नाही. सातारकर संयमी आहे, म्हणून प्रशासन काहीच हालचाल करत नसेल तर सातारकरांना “क्रांतिकारी बाणा’ दाखवावा लागेल. साताऱ्यात दररोज सातशे ते नऊशेच्या दरम्यान रूग्ण वाढत आहेत. त्यांना बेड उपलब्ध होत नाहीत तर ऑक्सिजनेटेड बेड आणि व्हेंटिलेटर हा लांबचा विषय आहे. जिल्ह्यात एकूण किती बेड आहेत आणि नवीन बाधितांना त्याची
उपलब्धता कुठे होईल, याची एकही माहिती 1077 क्रमांकावर मिळत नाही. त्याबाबत विचारणा केली तर जिल्हाधिकारी महोदयांनी आम्हाला आपण कोणतीही माहिती माझ्या परवानगीशिवाय देऊ नका, असे सांगितले जाते. जिल्हात किती रेमिडेसिवर उपलब्ध आहेत आणि ती मिळविण्यासाठीची प्रक्रिया काय, याचीही माहिती मिळत नाही. ही इंजेक्शन मिळविण्यासाठी करोनाबाधितांच्या नातेवाईकांना प्रचंड यातना सहन कराव्या लागत आहेत. सामाजिक कार्यकर्ते आणि माहिती अधिकार कार्यकर्ते तर या रेमिडेसिवर इंजेक्शनचा काळा बाजार होत असल्याचा दावा करत असल्याची माहितीही पत्रकात दिली आहे.
करोबाधितांची संख्या वाढत असताना लॉकडाऊनच्या काळात जिल्हा प्रशासनाने करोना रोखण्याच्या अनुषंगाने नेमक्या काय उपाययोजना आखल्या, बाधितांना बेड उपलब्ध होत नाहीत, त्यामुळे जिल्ह्यात किती बेड उपलब्ध आहेत याची माहिती रोज प्रसिध्द करावी, जम्बो कोविड हॉस्पिटल लवकरच कार्यान्वीत करणार असल्याचे प्रशासन सांगत आहे. मात्र, ते पूर्ण कधी होणार आणि त्यामध्ये आत अडचणी काय आहेत, याविषयी कोणी बोलत नाही.
बेड मिळाला आहे, त्या बाधितांना रेमिडेसिबर उपलब्ध होत नाहीत, बाधित गर्भवती महिलांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. बेड मिळत नसल्यामुळे त्यांची फरफट होत आहे आणि जिल्हा रूग्णालयात जागा मिळाली तर खाली गादी टाकून त्यांची व्यवस्था केली जात आहे. यामुळे गर्भवती महिलांचे मानसिक आरोग्य धोक्यात आले आहे. सामान्य नागरिक आणि जबाबदार लोकप्रतिनीधी म्हणून आम्ही करायचे तरी काय, याबाबत तुमच्याच उत्तराची प्रतीक्षा करत आहे, असे पत्रकात म्हटले आहे.
आमच्या या मागण्यांबाबत विचार करावा, अशी मागणी असून या प्रश्नांची उत्तरे मिळावीत. जिल्हा प्रशासनाने वारंवार कायद्यावर बोट न ठेवता माणुसकी आणि भावनात्मक बाजूनेही विचार करावा, यावर सकारात्मक विचार नाही केला तर आम्ही येत्या सोमवारी दि. 28 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढू, असा इशारा मोहिते यांनी दिला आहे.
सर्वसामान्य सातारकरांनी मरून जायचे का?
जिल्हा प्रशासनाने आता आमच्यासमोर काही पर्याय ठेवलेला नाही. कलेक्टरसाहेब, शासकीय विभागातील प्रत्येक यंत्रणांनी त्यांच्यासाठी राखीव बेडची तजवीज केली आहे, असे सांगितले जाते. अहो, मग आमच्यासारख्या सर्वसामान्य सातारकरांनी मरायचे का? आम्हाला जगण्याचा अधिकार आहे की नाही? की फक्त अधिकान्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी जगायचे आणि गोरगरीब जनता,शेतकऱ्यांनी मरायचे? तुम्हाला ठोस भूमिका घेऊन कार्यपध्दती बदलावी लागेल.
तुम्ही आता सातारकरांचा अंत पाहू नका. सातारकरांनी संयम दाखविला. आता हा संयम तुटत चालला आहे.सातारकरांची परीक्षा तुम्ही काही घेऊ नका. आता लोकांसमोर जनआंदोलन करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही, असा इशाराही या पत्रकात दिला आहे.