नवी दिल्ली – कोविडच्या दुसऱ्या लाटेतून देश सावरत असल्याचे दिसून येत असून केंद्र सरकारने जी आर्थिक सवलत व पॅकेज जाहीर केले आहे त्यामुळे आणि लसीकरण वेगाने होत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशाची अर्थव्यवस्था सुधारण्याचे संकेत मिळत आहेत असे केंद्रीय अर्थमंत्रालयाने म्हटले आहे.
अर्थमंत्रालयाने देशातील आर्थिक घडामोडींचा महिन्याचा जो आढावा घेतला आहे त्यात त्यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकारने जवळपास 6 लाख 29 हजार कोटी रूपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. तसेच आरबीआयही अर्थव्यवस्थेला पूरक निर्णय घेत आहे. त्यामुळे आर्थिक घडामोडींना आता वेग येत आहे.
केंद्र सरकारने आत्तापर्यंत आठ मोठ्या सवलत योजना जाहीर केल्या आहेत. त्यात आरोग्य क्षेत्रातील सुधारणेलाही मोठा वाव देण्यात आला आहे. केंद्र सरकारने पाच लाख पर्यटकांना भारतात येण्यासाठी व्हिसा फी माफीही दिली आहे. तसेच सरकारने भांडवली खर्चही वाढवला आहे. त्यातून रेल्वे व रस्ते विकासांच्या प्रकल्पांनाहीं चालना मिळत आहे.
आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेतून रोजगार निर्मीतीलाही मोठी चालना दिली जात असून त्यातून आता ग्राहकांच्या कंझम्पशनचे प्रमाण वाढेल असेही अर्थमंत्रालयाने म्हटले आहे.
सध्या अन्नाची महागाई मोठ्या प्रमाणात झालेली दिसत असली तरी मान्सुनचा चांगला पाऊस सर्वत्र होत असल्याने आणि त्यामुळे खरीपाच्या पिकांमध्ये पेरणीचा हंगाम सुरू झाल्याने अन्नपदार्थांच्या किंमतीही लवकरच खाली येण्याची चिन्हे आहेत असेही अर्थमंत्रालयाने म्हटले आहे.
तथापि ईनपुट कॉस्ट प्रेशर आणि जागतिक स्थिती लक्षात घेता अर्थव्यवस्थेवर येणारा दबाव अजून इतक्यात कमी होण्याची शक्यता नाही असेही यात नमूद करण्यात आले आहे.