नवी दिल्ली – झारखंडमधील मंत्रिमंडळ विस्तारावरून सत्तारूढ आघाडीचा घटक असणाऱ्या कॉंग्रेसमध्ये असंतोषाची ठिणगी पडली आहे. जुन्याच मंत्र्यांना पुन्हा स्थान देण्यात आल्याने कॉंग्रेसचे १२ आमदार नाराज झाले आहेत. त्यातून ८ आमदारांनी पक्षश्रेष्ठींची भेट घेण्यासाठी दिल्लीला कूच केले आहे. त्या घडामोडींमुळे झारखंडमध्ये राजकीय पेच उद्भवण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
झारखंड मुक्ती मोर्चाचे (झामुमो) नेते हेमंत सोरेन यांनी ईडीचा ससेमिरा मागे लागल्याने काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर ईडीने त्यांना लगेचच अटक केली. त्यामुळे झारखंडमध्ये मुख्यमंत्री बदल होऊन चंपाई सोरेन यांच्याकडे सुत्रे गेली. त्यांनी शुक्रवारी मंत्रिमंडळाचा विस्तार केला.
त्यामुळे मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या कॉंग्रेसच्या मंत्र्यांची संख्या आधीइतकीच ४ झाली. मात्र, त्या चौघांचेही मंत्रिमंडळातील स्थान कायम राहिले. मुख्यमंत्री बदलानंतर इतरांना मंत्रिपदांची संधी मिळावी, अशी कॉंग्रेस आमदारांची इच्छा होती. ती पूर्ण न झाल्याने ते नाराज झाले आहेत. मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी मिळावी ही मागणी मांडण्यासाठी संबंधित आमदार कॉंग्रेस श्रेष्ठींची भेट घेणार आहेत. मागणी मान्य न झाल्यास विधानसभेच्या आगामी अधिवेशनावर बहिष्कार टाकण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
झारखंडमध्ये झामुमो, कॉंग्रेस आणि राजद या पक्षांच्या आघाडीचे सरकार आहे. त्या राज्यातील विधानसभेचे एकूण संख्याबळ ८१ आहे. झामुमोचे २९, तर कॉंग्रेसचे १७ आमदार आहेत. राजदचा अवघा १ आमदार आहे.