पुणे – बालगंधर्व येथे केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीने आंदोलन केले होते. यावेळी राष्ट्रवादीच्या महिला नेत्यांना भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून मारहाण कऱण्यात आली होती. त्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली. मात्र त्यांच्या प्रतिक्रियेवरून वाद निर्माण झाला असून इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी देखील सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली आहे.
पाय तोडू, हात तोडू हे मध्ययुगीन काळातील कायदे आहेत. ते संविधानिक लोकशाहीच्या विरोधातील आहेत, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव न घेता श्रीमंत कोकाटे यांनी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे जिल्ह्यातील कार्यकर्त्या वैशाली नागवडे यांना भाजपच्या पुरूष कार्यकर्त्यांने मारहाण केली केल्यानंतर प्रतिक्रिया देताना खासदार सुप्रिया सुळे यांनी,यापुढे कोणी महिला कार्यकर्त्यांवर हात उचलला तर त्याचा हात काढला जाईल. असे खळबळ उडवून देणारे विधान केले होते.
सुप्रिया सुळे यांच्या विधानावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी देखील टीका केली आहे. ‘कानफाटात मारावीशी वाटली होती’, या वक्तव्यावरुन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करणारे मर्दांचे महा विकास आघाडी सरकार आता “हात तोडण्याची” भाषा करणाऱ्या खासदार सुप्रिया सुळेंवर तशीच कारवाई करणार ना ? अहो बेस्ट मुख्यमंत्री… जनतेला दिसू तर द्या तुमची मर्दानगी..’ असं म्हणत अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारला सवाल केला आहे.