Chief Minister Eknath Shinde – मुख्यमंत्रीपद हे मोठे असले तरी या पदाची खुर्ची ही काटेरी आहे. गेल्या दोन दिवसांत मी एक मिनिटही झोपलो नाही असे विधान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
शिवसेना महिला सेनेचे ‘शिवदुर्गा महिला संमेलन’ मुंबईतील सायनमध्ये पार पडले. यावेळी ते बोलत होते. तसेच मी शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री केवळ बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे झालो असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, ”सर्वांना मुख्यमंत्रीपद हे खूप मोठे त्याचे अधिकार मोठे असे वाटत असते. काल हातकणंगले होतो. त्यानंतर रात्री दिल्लीला गेलो. पहाटे पाटण सात वाजता कार्यक्रमात हजर होतो. त्यानंतर तेथून कोकणात गेलो”, असे शिंदेंनी सांगितले.
याशिवाय ”हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे सुद्धा नेहमी म्हणायचे शिवसेनेची महिला आघाडी म्हणजे रणरागिणी आहे. अन्यायाला वाचा फोडून देण्याचे काम महिला आघडी करते. त्यांचे हेच विचार घेऊन आपण पुढे जात आहोत.
आज बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशिर्वादामुळेच मी शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री झालो. मात्र हा प्रवास सोपा नव्हता. यामध्ये अनेक आव्हानांचा सामना करावा लागला”, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
मविआ काळात निराशेचे वातावरण
समाजात महिला कुठेच कमी नाहीत. महिला सर्वक्षेत्रात आघाडीवर आहेत. देशाच्या राष्ट्रपतीपदी देखील महिला आहेत. महिला सुरक्षा अभियान आम्ही राबवत आहोत. यासाठी 100 कोटी रूपयांची तरतूद आम्ही करत आहोत.
मुंबई आणि ठाण्याच्या कमिशनरला सांगितले आहे. लेक लाडकी लखपती योजना, 50 टक्क्यात एसटी प्रवास महिलांसाठी केला. छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम करत आहोत.
महाविकास आघाडीचं सरकार होते त्यावेळी अडीच वर्ष निराशेचे वातावरण होते. मात्र आम्ही चैतन्याचे वातावरण निर्माण केले, असेही शिंदे म्हणाले. । Chief Minister Eknath Shinde