अर्शद आ. शेख
श्रीगोंदा – विधानसभा मतदारसंघाचे आरक्षण खुले झाल्यानंतर जेवढ्या निवडणुका झाल्या, त्यात स्व.शिवाजीराव नागवडे व स्व. कुंडलिकराव जगताप या दोन नेत्यांचा प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष प्रभाव होता. त्यांच्या कार्यपद्धतीचे मतदारांना या निमित्ताने स्मरण होताना दिसते. या दोन्ही किंगमेकरची उणीव त्यांच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीत जाणवत आहे.
शिवाजीराव नागवडे हे सहा वेळा विधानसभा निवडणूक लढले. पैकी दोन वेळा ते आमदार झाले. 1978 ला त्यांनी मोहनराव गाडे (जनता पक्ष) यांना पराभूत केले होते. तर 1999 ला बबनराव पाचपुते यांना. 1995 व 2009 च्या निवडणुकीत ते उमेदवार नव्हते, मात्र त्यांनी सारी शक्ती अनुक्रमे बाबासाहेब भोस व राजेंद्र नागवडे यांच्या मागे उभी केली होती.
2014 ला राहुल जगताप यांच्या विजयात नागवडे यांची भूमिका महत्त्वाची ठरली. गेल्यावर्षी नागवडे यांनी जगाचा निरोप घेतला. तत्पूर्वी कुंडलकीराव जगताप यांचेही देहावसान झाले. या दोन्ही नेत्यांच्या अनुपस्थितीत ही पहिली निवडणूक होत आहे. 1978 पासून ते एक वर्षापूर्वी पर्यंत तालुक्यात नागवडे व जगताप यांच्या शब्दाला वेगळे वजन व वलय होते.
नागवडे यांच्याप्रमाणेच कुंडलिकराव जगताप यांचा ही तालुक्यातील निवडणुकांवर प्रभाव राहिला. 1980 ला त्यांनी पहिली व शेवटची विधानसभा निवडणूक लढविली. पुढे त्यांना दरवेळी उमेदवारीची आमिष दाखवून नंतर डावलण्यात आले. जगताप कधी आमदार झाले नाही, मात्र आमदारकीच्या निवडणुकीत दरवेळेस त्यांची भूमिका किंगमेकरची राहीली.
1980 ला शिवाजीराव नागवडे (कॉंग्रेस) बबनराव पाचपुते (जनता पक्ष) या लढतीत जगताप हे असे कॉंग्रेसचे उमेदवार होते. पाचपुते यांना 27 हजार 992 मते मिळाली. नागवडे यांना 26 हजार 473 मते लाभली. जगताप यांनी 11 हजार 52 मते मिळवली. नागवडे यांचा 1 हजार 519 मतांनी पराभव झाला. जगताप यांची भूमिका नागवडे यांसाठी मारक तर पाचपुते यांच्यासाठी तारक ठरली. पुढे जगताप हे प्रत्येक निवडणुकीत किंगमेकरच्या भूमिकेत राहिले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे तालुक्यातील ते पहिले अनुयायी व नेते होते. त्यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री पवारांनी 1980 च्या निवडणुकीत तालुक्यात प्रचार सभा घेतली होती.
1985 च्या निवडणुकीत जगताप यांनी अर्ज भरला नंतर तो मागे घेतला. त्यांनी पाचपुतेंना मदत केल्याचे तेव्हा म्हटले गेले. 1990 ला जगताप यांना पुन्हा डावलले गेले. 1995 ला ते पाचपुते यांच्या व्यासपीठावर होते. 1999 ला कुकडी कारखाना हाच माझा पक्ष सांगत ते अलिप्त होते. 2004 ला ते भाजप उमेदवार होते. मात्र पक्षाने ऐनवेळी ही जागा शेतकरी संघटनेला दिली व जगताप यांना पुन्हा थांबवले गेले. तेव्हा देखील जगतापांचा छुपा आशीर्वाद पाचपुते यांना मिळाल्याची चर्चा झाली. 2009 ला जगताप यांच्या मार्गात अडचण झाली ती राजेंद्र नागवडे यांची.
भाजपची उमेदवारी नागवडे यांनी पटकावली. जगताप पुन्हा किंगमेकरच्या भूमिकेत गेले. 2014 ला मात्र जगताप यांचे नशीब खुलले. आमदार पदाने कायम हुलकावणी दिली होती. आमदार होता आले नसले तरी आमदाराचा बाप होण्याचे भाग्य त्यांना यावेळी मिळाले. शिवाजीराव नागवडे व कुंडलिकराव जगताप हे दोन्ही नेते आज हयात असते तर तालुक्याचे राजकारण आता दिसते तसे राहिले असते का याची चर्चा सर्वदूर होत आहे.
पंतप्रधानांमुळे हुकली नागवडे यांची आमदारकी
1990 च्या निवडणुकीत नागवडे यांनी प्रचारात आघाडी घेतली होती.त्यांचा विजय आवाक्यात होता. ऐनवेळी श्रीगोंद्यात पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांच्या सभेचा निरोप आला. बबनराव पाचपुते (जनता दल) यांच्यासाठी त्यांनी प्रचंड मोठी सभा घेतली. निवडणूक प्रचाराची ती शेवटची सभा होती. वातावरण फिरले. पाचपुते काठावर जिंकले. अन् नागवडे आमदारकीची लढत हरले फक्त 818 मतांनी.