नवी दिल्ली – भारताची अव्वल नेमबाज तेजस्विनी सावंत हिने पंजाबच्या अंजूम मुदगिल हिने वर्चस्व मोडीत काढत नेमबाजी सराव स्पर्धेत महिलांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात विजेतेपद मिळवले. या विजेतेपदासह तीने 1171 गुणांची कमाई करत विक्रमी साकार केला.
येथील डॉ. कर्णी सिंग नेमबाजी संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेत टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या दोन नेमबाजांमध्ये विजेतेपदासाठी चांगलीच लढत झाली. महाराष्ट्राच्या तेजस्विनीने पात्रता फेरीत 1171 गुणांची कमाई करत अव्वल स्थान मिळवले होते. त्यानंतर अंतिम फेरीत 458.7 गुण मिळवत तिने अंजूमवर वर्चस्व राखले. तेजस्विनीकडून यंदा टोकियो ऑलिम्पिकच्या पदकाची आशा केली जात असून या विजेतेपदाने तीचा आत्मविश्वास उंचावला आहे.
अंजूमला अंतिम फेरीत 457.8 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. पात्रता फेरीत तिने 1167 गुण मिळवले होते. मध्य प्रदेशच्या सुनिधी चौहान हिने 1168 गुणांची कमाई केली होती. मात्र हरयाणाच्या निश्चल हिने लज्जा गोस्वामीला मागे टाकत अंतिम फेरीत तिसरे स्थान प्राप्त केले.