सिडनी – दुखापतीवर मात करत पूर्ण तंदुरुस्त होऊन लवकरच संघात परतेन, असा विश्वास अष्टपैलू रवींद्र जडेजा याने व्यक्त केला आहे. जडेजाला सिडनी कसोटीत फलंदाजी करताना हाताच्या आंगठ्याला चेंडू लागल्याने दुखापत झाली आहे. त्यानंतरही त्याने वेदनाशामक इंजेक्शन घेऊन फलंदाजी करण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, रवीचंद्रन अश्विन व हनुमा विहारी यांनी नाबाद खेळी केल्यामुळे त्याला फलंदाजीसाठी येण्याची गरज पडली नाही. मात्र, आता तो मायदेशी परतणार असून त्याला पूर्ण तंदुरुस्त होण्यासाठी वेळ लागेल असे बीसीसीआयने स्पष्ट केले होते.
तसेच भारताच्या दौऱ्यावर येत असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन कसोटीतही त्याला खेळता येणार नसल्याचे सांगितले जात होते. मात्र, जडेजाने याबाबत भिन्न मत व्यक्त करताना इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी संघात परतणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला खेळाडूंच्या दुखापतीने चांगलेच सतावले आहे. महंमद शमी, उमेश यादव, लोकेश राहुल, हनुमा विहारी, ऋषभ पंत व रविंद्र जाडेजा यांना दुखापत झाल्यामुळे आता चौथ्या कसोटीत भारतीय संघ कशी कामगिरी करतो हे महत्वाचे ठरणार असून याच सामन्याचा निकाल मालिकेसाठी निर्णायक ठरणार आहे.
तिसऱ्या कसोटी सामन्यात फलंदाजी करताना मिशेल स्टार्कचा उसळता चेंडू लागल्याने जडेजाचा डाव्या हाताचा अंगठा दुखावला गेला होता. आंगठ्यावर शस्त्रक्रीया झाली असून लवकरच संघात परतणार आहे, असेही जडेजाने सांगितले. इंग्लंडविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला 5 फेब्रुवारीपासून चेन्नई येथे पहिल्या कसोटी सामन्याने सुरुवात होत आहे.