नवी दिल्ली : झारखंडच्या गिरिडीह जिल्ह्यात नक्षलवाद्यांमुळे चांगलीच दहशत पसरवली आहे. या जिल्ह्यातल्या बराकर नदीवरचा एक मोठा पूल आणि एक मोबाइल टॉवर नक्षलवाद्यांनी काल मध्यरात्री बॉम्बने उडवला असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गिरिडीह जिल्ह्यातल्या डुमरी पोलीस स्टेशन अंतर्गत येणारा हा पूल मध्यरात्री २ ते २.३० वाजताच्या दरम्यान उडवण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे.
A bridge under Dumri police station limits of Giridih district blew up by Naxals around 2- 2:30 am last night: Jharkhand Police
— ANI (@ANI) January 23, 2022
या स्फोटानंतर पुलाची एक बाजू पूर्णतः उध्वस्त झाली आहे. त्यामुळे या भागातली वाहतूकही खोळंबली आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, नक्षलवाद्यांनी घटनास्थळावरून परतण्यापूर्वी तिथे एक चिठ्ठीही लिहून ठेवली आहे. त्यात लिहिलं आहे की अटक करण्यात आलेला नक्षलवादी प्रशांत बोस आणि त्यांच्या पत्नीला चांगली वैद्यकीय सेवा देण्याचे आणि २१ ते २६ जानेवारी दरम्यान होणारा प्रतिकार मोर्चा यशस्वी करण्यासाठी सांगण्यात आले आहे.
गिरिहीड जिल्ह्यातली ही पहिलीच घटना नाही. या परिसरात गेल्या दोन-तीन वर्षांपासून नक्षलवाद्यांची दहशत वाढली आहे. या आधी हे नक्षलवादी पीरटांड, डुमरी, भेलवाघाटी अशा दूरच्या भागांमध्ये हल्ले करत होते. मात्र आता ते गिरिडीह मधल्या प्रमुख जागांपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे पोलीस आणि स्थानिक प्रशासनाची चिंता वाढली आहे.