नवी दिल्ली – बिहारचे मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे नेते नितीश कुमार यांना आज झटका बसला. त्यांचे जवळचे सहकारी प्रमोद चंद्रवंशी यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे नेते विनोद तावडे आणि सुशील सिंह आणि संजय मयुख यांच्या उपस्थितीत चंद्रवंशी यांनी भाजपचे कमळ हाती घेतले.
दरम्यान, यावेळी तावडे यांनी नितीश यांना लक्ष्य केले. ते म्हणाले की, ज्या नितीश कुमार जे मुद्दे उपस्थित करून जनतेपर्यंत जाण्याचा प्रयत्न करत आहेत तेच मुद्दे त्यांच्या हातातून निसटत चालले आहेत. राहुल गांधी यांच्या संदर्भात बोलताना ते म्हणाले की राहुल यांना पुन्हा खासदारकी बहाल करण्याच्या निर्णयामुळे त्यांच्याच विरोधी आघाडीत कही खुशी तर कही गम असे वातावरण आहे.
विरोधी पक्षांची घमंडिया आघाडी आपल्या नेतृत्वाखाली असावी अशी नितीश काकांची इच्छा आहे. मात्र तेजस्वी यादव यांनीच त्याला टाचणी लावत आघाडीचे नेतृत्व राहुल गांधी करतील असे म्हटले आहे. या प्रकारामुळे नितीश यांची द्विधा मनस्थिती झाली असून बिहारमध्ये भाजपला मिळणारा पाठिंबा वाढत चालला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत या राज्यातील अनेक नेते भाजपमध्ये दाखल होत आहेत. प्रमोद चंद्रवंशी यांच्या आजच्या प्रवेशामुळे बिहारमध्ये भाजप आणखी मजबुत होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.