मुंबई – “काँग्रेसशिवाय सरकार आहे अशी शंका नाना पटोले यांना का यावी. हे सरकार बनवताना आम्ही आघाडीवर होतो.” नाना पटोलेंच्या वक्तव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हे सरकार एकमेकांच्या मदतीनं, सहकार्यानेच चाललं आहे. याचं विस्मरण तिन्ही पक्षातील कोणालाही झालेलं नाही. असेही राऊत यावेळी म्हणाले. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘सरकार आमच्यामुळे आहे, आम्ही सरकारमुळे नाहीत. असे विधान केले होते.
संजय राऊत म्हणाले की, “काँग्रेसशिवाय सरकार आहे अशी शंका नाना पटोले यांना का यावी. हे सरकार बनवताना आम्ही आघाडीवर होतो. राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी यांच्याशी सुरुवातीपासूनच आमच्या चर्चा सुरु होत्या. शरद पवार, उद्धव ठाकरे किंवा अन्य नेते असतील…त्यामुळे हे सरकार एकमेकांच्या मदतीनं, सहकार्यानेच चाललं आहे. याचं विस्मरण तिन्ही पक्षातील कोणालाही झालेलं नाही.”
काय म्हणाले होते नाना पटोले, “आम्ही याआधीही अनेकदा सांगितलं आहे की हे सरकार आमच्यामुळे आहे, आम्ही सरकारमुळे नाहीत. आमच्या नेत्यांनीही तेच सांगितलं आहे. आमची सरकारमध्ये खूप सारी भागीदारी नाहीये. पण सगळ्यांचा समान विकास व्हायला हवा. उद्धवजी किंवा अजित पवार यांच्यासोबत किमान समान कार्यक्रमाच्या आधारावरच आमचं नातं जोडलं गेलं आहे”
२०१९मध्ये राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेस असे तीन वेगळ्या विचारसरणीचे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले आहे. दरम्यान या तिन्ही पक्षांमध्ये वेळोवेळी मतभेद असल्याचं समोर आले आहे. विशेषत: काँग्रेसकडून वारंवार यासंदर्भात जाहीर भूमिका देखील घेतल्या गेल्या आहेत. दरम्यान आज परत एकदा नाना पटोले यांच्या मुलाखतीमधून हे दिसून आले आहे.